मुंबई । भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने आपल्या कार्यकीर्दीच्या सुरवातीला चांगली गोलंदाजी करून छाप सोडली होती. मात्र कामगिरीत सातत्यपूर्णचा अभाव असल्यामुळे त्याला संघातील स्थान टिकवता आले नाही. त्यामुळे तो संघाबाहेर गेला. दक्षिण आफ्रिकेत 2007 साली झालेल्या टी-20 विश्वचषकात चांगली गोलंदाजी करून भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता. राष्ट्रीय संघात त्याला स्थान मिळत नसल्याने अखेर त्याने याच वर्षी जानेवारी महिन्यात क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.
इरफान पठाणने त्याचा शेवटचा सामना 2012 साली खेळला होता. या सामन्यात धारदार गोलंदाजी करत त्याने 29 धावा देऊन 5 गडी बाद केले होते. त्याच्या चमकदार कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आला. त्यानंतर त्याने स्थानिक सामन्यातही लक्षवेधक कामगिरी केली, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. चांगली कामगिरी करूनही संधी मिळत नसल्याने त्यांची कारकीर्द संपली असा धक्कादायक खुलासा इरफान पठाणने केला आहे.
इरफान पठाण म्हणाला की, ” मी माझ्या शेवटच्या एकदिवसीय आणि टी- 20 सामन्यात सामनावीराचा पुरस्कार जिंकला होता तरीही संघात माझे पुनरागमन झाले नाही. मला आठवते, यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा एक वर्ष क्रिकेट खेळला नव्हता तरीही त्याला भारतीय संघात स्थान मिळाले. साहाच्या गैरहजेरीत ऋषभ पंतने 200 धावा केल्या होता, तरीही साहाचे पुनरागमन झाले. संघात काही खेळाडूंना समर्थन मिळत होते तर काहींना नाही मिळत नव्हते. मी त्या खेळाडूंमध्ये होतो ज्यांना समर्थन मिळाले नाही. हे माझं दुर्दैव आहे.”
इरफान पठाण पुढे बोलताना म्हणाला, “महेंद्रसिंग धोनीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील माझ्या प्रदर्शनावर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर मी धोनीकडून माझ्या कामगिरीविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा धोनीने सर्व काही ठीक चालले असल्याचे मला सांगितले. नंतर मला कळाले की, मीडियाने धोनीच्या वाक्याचा विपर्यास करून बातमी दिली होती.”
इरफान पठाणने भारताकडून 29 कसोटी,120 एकदिवसीय, टी- 20 सामन्यात एकूण 301 बळी घेतले आहेत. सध्या तो प्रशिक्षक आणि समालोचकाच्या भूमिकेत आहे.