भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या भूमीत ऐतिहासिक कामगिरी करत जगभरात विजयाचा डंका पिटला आहे. एकवेळ ३६ धावांवर सर्वबाद होण्याची नामुष्की ओढावल्यानंतर भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत २-१ च्या फरकाने मालिका खिशात घातली. या मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे खेळवण्यात आला होता. खराब फॉर्ममध्ये असलेल्या युवा फलंदाज पृथ्वी शॉ याला विश्रांती देऊन त्याच्याजागी शुबमन गिल याला या सामन्यात संधी देण्यात आली होती. त्यामुळे गिलने या सामन्याद्वारे त्याचे कसोटी पदार्पण केले होते. आता गिलने त्याच्या पदार्पणाविषयी मोठा खुलासा केला आहे.
पदार्पणाच्या रात्री झोपीच्या गोळ्या घ्याव्या लागल्या- गिल
एका प्रसिद्ध वृत्तपत्राशी बोलताना गिल म्हणाला की, “ऍडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यापुर्वीच मला माझ्या पदार्पणाची कल्पना होती. या विचाराने मेलबर्न कसोटी सुरू होण्याच्या आधीच्या रात्री मला झोपच आली नाही. अक्षरश: मी शांत झोप लागावी म्हणून झोपीच्या गोळ्या खाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा कसोटी सामन्याची सुरुवात झाली, तेव्हा ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजीसाठी करणार होता. त्यामुळे आम्हाला क्षेत्ररक्षण करावे लागणार होते. पूर्ण संघ मैदानावर असल्याने मला माझ्या पदार्पणाची तेवढी जाणीव झाली नाही.”
“त्याच दिवशी संध्याकाळी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव संपल्याने मला सलामीला फलंदाजीसाठी जायचे होते. यावेळी मी खूप घाबरलो होतो. आपल्यापुढे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उत्कृष्ट गोलंदाज आहेत. मला त्यांचा सामना करता येईल का?, असे मला वाटू लागले. परंतु १०-१२ चेंडू खेळल्यानंतर मी स्वत:ला सावरले आणि ही पूर्ण लक्ष केंद्रित करून खेळण्याची वेळ असे स्वत:ला म्हणत त्यांचा सामना केला,” असे पुढे बोलताना गिलने सांगितले.
सामना विजयात उचलला महत्त्वाचा वाटा
मेलबर्न कसोटीत गिलने पहिल्या डावात ६५ चेंडूंमध्ये ४५ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात त्याने नाबाद ३५ धावांची अतिशय महत्त्वपूर्ण खेळी होती. सोबतच क्षेत्ररक्षण करताना त्याने ऑस्ट्रेलियाचा धाकड फलंदाज मार्नस लॅब्यूशाने याचा झेल पकडला होता. त्याच्या या योगदानामुळे भारतीय संघाने ८ विकेट्सने त्या सामन्यात विजयी पताका झळकावली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
चेतेश्वर पुजराला अजूनही वनडे आणि टी२० क्रिकेट खेळण्याची आस, म्हणाला….
“क्रिकेट ग्राउंडच विकत घे,” इरफान पठानचा रिषभ पंतच्या ‘त्या’ पोस्टवर मजेशीर सल्ला