शेरे बांगला स्टेडियम, ढाका येथे झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात विंडीजने बांगलादेशला 50 धावांनी पराभूत केले. यामुळे विंडीजने तीन सामन्यांची टी20 मालिका 2-1 अशी खिशात घातली.
या सामन्यात विंडीजचा फलंदाज एविन लुईसने स्फोटक फलंदाजी करत 36 चेंडूत 89 धावा केल्या. मात्र हा सामना लुईसच्या फलंदाजीने नाही पंच तनवीर अहमद यांनी दिलेल्या नो बॉलच्या निर्णयाने चांगलाच गाजला.
यामध्ये ओशेन थॉमसने टाकलेल्या चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर लिंटन दासने मिडऑफवर शॉट मारला. हा झेल क्षेत्ररक्षकाने पकडला असता पंच तनवीर अहमद यांनी त्याला नो बॉल असा निर्णय दिला. मात्र टीव्हीच्या फुटेजमध्ये तो निर्णय चुकीचा असल्याचे लक्षात आले.
यामुळे विंडीजचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेट याने पंचांच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच थॉमसच्या या षटकात पंचांनी दुसऱ्यांदा नो बॉल दिल्याने ब्रेथवेटने रिव्ह्यूची मागणी केली होती.
“मी येथे पंचांवर कोणतेही आरोप करत नसून त्यांनी बरोबर निर्णय द्यावे एवढेच माझे म्हणणे आहे”, असे ब्रेथवेट म्हणाला.
बांगलादेशच्या पक्षात हा निर्णय गेल्याने त्यांना फ्री हीट मिळाली. यावर सौम्य सरकारने षटकार मारला. तसेच या वादामुळे सामना 8 मिनिटे थांबवला गेला.
“नो बॉलचा निर्णय हा सर्वात कठीण असतो. जेव्हा गोलंदाजाचा पाय आणि रेषा यामध्ये अंतर कमी असल्याने काही वेळा निर्णय चुकतो. मी आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवीन आहे”, असे पंच अहमद म्हणाले.
“काल माझ्याकडून जी चूक झाली ती आतापर्यतची एकमेव चूक आहे. माझ्या मागील सामन्यांमधील कामगिरी चांगली आहे”, असेही अहमद म्हणाले.
याआधीही अहमद यांचे मैदानावर खेळाडूंसोबत वाद झाले आहे. ढाका प्रीमियर लीगमध्ये तमीम इक्बालसोबत झालेल्या वादाने अहमद मैदान सोडून गेले होते.
महत्त्वाच्या बातम्या:
–आयपीएलच्या १२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच अशी गोष्ट होणार
–एमएस धोनीच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात मोठी खुशखबर
–ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड विरुद्ध वनडे मालिकेसाठी अशी आहे १६ खेळाडूंची टीम इंडिया