रांची | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा सामना रांची येथे सुरु आहे. भारतीय संघाचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार एमएस धोनीचे हे होम ग्राऊंड आहे. अनेक क्रिकेट तज्ञांच्या मते हा धोनीचा घरच्या मैदानावरील हा शेवटचा सामना असेल. याला कारण म्हणजे विश्वचषक २०१९नंतर धोनी निवृत्त होईल अशी शक्यता आहे.
असे असले तरी भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज सौरव गांगुलीने मात्र धोनी विश्वचषक २०१९नंतरही खेळत राहण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
“एमएस धोनी विश्वचषकानंतरही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतो. जर भारतीय संघ विश्वचषक जिंकला आणि धोनीने सातत्यपुर्ण कामगिरी केली तर त्याने निवृत्ती घेण्याचा प्रश्नच येत नाही. जर चांगली कामगिरी होत असले तर वय ही गोष्ट अडचण ठरु शकत नाही.” असे गांगुली म्हणाला.