आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठीची तयारी आता सुरू झाली आहे. अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड मध्ये 18 जून ते 22 जून या कालावधीत साऊथॅम्प्टन येथे खेळला जाणार आहे. भारताने अखेरच्या कसोटी मालिकेत इंग्लंडला 3-1 ने हरवून या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. तर अंतिम सामन्यात पोहोचणारा न्यूझीलंडचा संघ पहिला संघ होता. ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा रद्द झाल्यानंतर त्यांना थेट अंतिम फेरीत स्थान मिळाले.
क्रिकेटच्या इतर प्रकारांपेक्षा कसोटी मध्ये तुलनात्मक दृष्ट्या कमी षटकार बघायला मिळतात. कारण कसोटी क्रिकेट मध्ये फलंदाजांकडे फार वेळ असतो व ते खराब फटका खेळून विकेट गमावू इच्छित नाही. जरी कसोटी क्रिकेट मध्ये फारसे षटकार ठोकले जात नसले तरी काही फलंदाजांनी आपल्या आक्रमक फलंदाजीने क्रिकेट रसिंकाची मने जिंकली आहेत. आपण या लेखात बघणार आहोत असे 3 भारतीय फलंदाज ज्यांनी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक षटकार ठोकले आहेत.
3) रिषभ पंत- भारतीय कसोटी संघाचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत हा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. वेगवान गोलंदाज असो वा फिरकी गोलंदाज, सर्वांच्या विरुद्ध आक्रमक फटके खेळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान रिषभने आपल्या फलंदाजीने सर्वांची वाहवा मिळवली. त्याने भारताकडून अनेक सामन्यात शानदार कामगिरी केली. रिषभने स्पर्धेदरम्यान 11 कसोटी सामन्यात 662 धावा केल्या, आणि यावेळी त्याने 16 गगनचुंबी षटकार ठोकले.
2) मयंक अग्रवाल- सलामीवीर मयंक अग्रवाल हा बर्याच काळापासून भारतीय संघाचा भरवशाचा फलंदाज आहे. तथापि, शेवटच्या 2 मालिकेसाठी रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांना सलामीची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेषतः ऑस्ट्रेलियामधील खराब कामगिरीनंतर मयंक अग्रवालला अंतिम 11 मधून वगळण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंतच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत मयंकने उत्तम कामगिरी केलेली आहे. मयंकने 12 कसोटी सामन्यांच्या 20 डावात 857 धावा केल्या असून, या काळात त्याने 18 षटकारही ठोकले आहेत.
1) रोहित शर्मा- कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर बनल्यानंतर रोहित शर्माने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ज्या प्रकारची कामगिरी केली होती तीच कसोटी मध्ये केली आहे. रोहित शर्मा कसोटीत सलामीला आल्यानंतर तेव्हापासूनच्या त्याच्या फलंदाजीमध्ये सुधारणा दिसू लागली आहे. रोहित सातत्याने शानदार कामगिरी करत आहे. या स्पर्धेत रोहितने अनेक शानदार खेळी केलेल्या आहेत आणि बर्याच सामन्यांमध्ये त्याने भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले आहे. रोहित शर्माने या स्पर्धेत 17 डावात 27 षटकार ठोकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्ती जाहीर करुनही पुनरागमन करणारे ८ खेळाडू, ३ आहेत पाकिस्तानी
आयपीएल आयोजनासाठी भारत-इंग्लंड कसोटी मालिकेला लागणार कात्री? पाहा काय आहे बीसीसीआयचा प्लॅन