महाराष्ट्र, भारतीय रेल्वे व गोवा अशा संघाचे प्रतिनिधित्व केलेली पश्चिम रेल्वेची राष्ट्रीय खेळाडु नेहा घाडगे (Neha Ghadge) यांनी खेल कबड्डी डॉट इन (khelkabaddi.in) या वेबसाईटच्या फेसबुक पेजवरून आपल्या चाहत्यांशी संवाद साधला.
यावेळी एका चाहत्याने नेहाला, “महाराष्ट्र (Maharashtra) व रेल्वे (Indian Railway) संघात काय फरक जाणवतो ?” असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना नेहाने सांगितले की “खूप फरक जाणवतो. महाराष्ट्र कौशल्यात कधीच कमी पडत नाही किंवा वैयक्तिक पातळीवर मेहनतीतही कमी पडत नाही. पण वेळेवर संघ म्हणून खेळण्यात महाराष्ट्र कमी पडतो. रेल्वेत सर्व भाषाचे, प्रांताचे व तसेच राज्याचे खेळाडु असतात. हरियाना (Haryana), हिमाचल प्रदेश Himachal Pradesh), तामिळनाडू (Tamilnadu), बंगाल (Bengal) सर्व ठिकाणचे खेळाडू असतात. आम्ही प्रत्येक गोष्टी वरून भांडत असतो, कधी प्रॅक्टिस वरून तर कधी जेवणावरून पण जेव्हा भारतीय रेल्वे संघाची किट घालतो. तेव्हा आम्ही फक्त भारतीय रेल्वेच्या असतो तेव्हा आम्हाला कोणतं राज्य दिसत नाही.”
“विविध राज्यातील खेळाडु असल्याने आम्हाला एकमेकांच्या भाषा समजल्या नाही तरीही आम्ही बॉडी लँग्वेज वरून समोरच्या खेळाडूला काय महाण्याकगे आहे हे ओळखून एकमेकींना सहाय्य करतो. मला वाटतं महाराष्ट्र येथेच कमी पडतो. महाराष्ट्र वैयक्तिक खेळायला जातो. ज्याप्रकारे आधी खेळायचे तसा आता खेळताना दिसत नाहीत. कदाचित जनरेशन गॅप असेल आणखीनही त्याला बरीच कारण आहेत. रेल्वेचे २ महिने कॅम्प होतात तर महाराष्ट्राचे १०-१५ दिवसांच कॅम्प होतात हा एक मोठा फरक आहे.”
“पण ज्यादिवशी महाराष्ट्र एकत्र येऊन खेळेल, जेव्हा नवीन व जुन्या खेळाडु बरोबरच अनुभव, कौशल्य व ताकद यांचा समतोल साधून सरावासाठी वेळ देऊन महाराष्ट्र संघ खेळेल तेव्हा महाराष्ट्र नक्कीच वरती खेळेल कारण महाराष्ट्रातील खेळाडूंच्यात प्रतिभेची कमी नाही.”