रविवारचा दिवस (२५ ऑक्टोबर) क्रिकेटप्रेमींसाठी नेहमी लक्षात राहण्याजोगा ठरला. या दिवशी क्रिकेटशौकिनांना ऐतिहासिक विजयाची नोंद होताना पाहायला मिळाली. यादिवशी दुबई येथे भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात टी२० विश्वचषक २०२१ मधील १६ वा सामना झाला. आजवर पाकिस्तानविरुद्ध टी२० विश्वचषकात अजेय राहिलेल्या भारताला यंदा लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानने सांघिक कामगिरीच्या जोरावर १० विकेट्सने भारतावर ऐतिहासिक विजय मिळवला. यासह त्यांच्या खात्यात अद्वितीय विक्रमाची नोंद झाली आहे.
या हाय व्होल्टेज सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली होती. भारताकडून पहिल्यांदा फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि केएल राहुल हे दोन्हीही सलामीवीर फ्लॉप ठरले. पुढे विराट कोहलीने कर्णधार खेळी करत संघाचा डाव सावरला. त्याने ४९ चेंडूंमध्ये १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ५७ धावांची खेळी केली. त्याच्याबरोबरच यष्टीरक्षक रिषभ पंतनेही ३९ धावांची ताबडतोब खेळी खेळली. यामुळे भारतीय संघ पाकिस्तानला १५२ धावांचे आव्हान देऊ शकला.
प्रत्युत्तरात भारताच्या एकाही गोलंदाजाला पाकिस्तानची विकेट घेता आली नाही. पाकिस्तानचे सलामीवीर मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक फलंदाज) आणि बाबर आझम (कर्णधार) यांच्या फलंदाजीपुढे भारतीय गोलंदाजांनी नांग्या टाकल्या. रिझवानने नाबाद ७९ आणि आझमने नाबाद ६८ धावा चोपत १७.५ षटकातच संघाला विजय मिळवून दिला. अशाप्रकारे पाकिस्तानने थेट १० विकेट्सने भारताचा लाजिरवाणा पराभव केला.
या विजयासह पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच १० विकेट्सने सामना जिंकण्याची किमया साधली आहे. याबरोबरच भारतीय संघ पहिल्यांदाच टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० विकेट्सने पराभूत झाला आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या या सर्वात छोट्या स्वरुपात बऱ्याचशा बलाढ्य संघांनी भारताला ९ विकेट्सने धूळ चारली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया (२००८, २०१२), वेस्ट इंडिज (२०१७) आणि दक्षिण आफ्रिका (२०१९) अशा एकाहून एक बळकट संघांचा समावेश आहे.
परंतु या संघांना सुद्धा जे जमले नाही, ते भारताचा कट्टर प्रतिद्वंद्वी पाकिस्तानने केले आहे. पाकिस्तान हा भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या अंतराने विजय मिळवला पहिला आणि एकमेव संघ बनला आहे. इतकेच नव्हे तर, फक्त टी२० स्वरुपात नाही तर आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच १० विकेट्सने पराभूत होण्याची नकोशी वेळही पाकिस्तानने भारतावर आणली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी घेतला सामन्याचा आस्वाद; विजयानंतर दिली ‘अशी’ प्रतिक्रिया