भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारत फक्त एका विकेटच्या अडथळ्यामुळे विजय मिळवू शकला नाही. कमी सूर्यप्रकाशामुळे सामना ठरलेल्या वेळेपेक्षा काही काळ आधी थांबवला गेला आणि भारतीय संघ विजयाला मुकला. भारताचा नियमित कसोटी कर्णधार विराट कोहली या सामन्यादरम्यान विश्रांतीवर होता. विराटच्या जागी अजिंक्य रहाणेने या सामन्यात संघाचे नेतृत्व केले.
आता याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठानने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्याच्या मते विराट या सामन्यात उपस्थित असता तर परिस्थिती वेगळी असती.
इरफानच्या मते पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व विराटने केले असते, तर सामन्याच निकाल वेगळा लागला असता. भारतीय संघाने सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या अंतिम टप्प्यात त्यांचा दुसरा डाव २३४ धावांवर घोषित केला. त्यानंतर न्यूझीलंडला चौथ्या दिवशी फक्त चार षटकांचा सामना करण्याची संधी मिळाली.
इरफानच्या मते, यावेळी विराट असता तर त्याने चौथ्या दिवशी भारताचा डाव लवकर घोषित केला असता. दरम्यान, भारताला शेवटच्या दिवशीच्या पहिल्या सत्रामध्ये एकही विकेट मिळाली नव्हती. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात मात्र रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विनने चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन केले आणि आठ विकेट्स घेतले. तरी देखील न्यूझीलंड संघ शेवटपर्यंत सर्वबाद झाला नाही आणि सामना अनिर्णीत राहिला.
इरफान ‘स्टार स्पोर्ट्स’च्या एका कार्यक्रमात यासंदर्भात बोलत होता. यावेळी तो म्हणाला की, “काल भारत आक्रमक क्रिकेट खेळून लवकर डाव घोषित करू शकत होता. जर या सामन्यात विराट कोहली असता, तर निकाल काही वेगळाच असता. जर विराट कोहली असता, तर नक्कीच भारताने काल लवकर डाव घोषित करून न्यूझीलंडला फलंदाजीसाठी बोलवले असते.”
दरम्यान, भारताने पहिल्या डावात ३४५ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघ २९६ धावांवर सर्वबाद झाला. पहिल्या डावात भारताने न्यूझीलंडवर ४९ धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात भारताने २३४ धावा केल्या आणि न्यूझीलंडसमोर विजयासाठी २८४ धावांचे लक्ष्य ठेवले. न्यूझीलंडने सामन्याच्या चौथ्या दिवशी एक आणि पाचव्या दिवशी आठ विकेट्स गमावले. न्यूझीलंडचे रचिन रविंद्र १८ आणि एजाज पटेल २ धावांसह शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिले आणि सामना अनिर्णित राखला.
भारताकडून या सामन्यातून त्याचे कसोटी पदार्पण केलेल्या श्रेयस अय्यरला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अय्यरने सामन्याच्या पहिल्या डावात १०५ आणि दुसऱ्या डावात ६५ धावांची खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई कसोटीत विराट कोणाच्या जागेवर खेळणार? अजिंक्य रहाणे म्हणतोय…
राहुल तेवतिया अडकला लग्नाच्या बेडीत, नव्या जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी पोहोचली ‘ही’ क्रिकेटर मंडळी
कपिल देवच्या नेतृत्त्वाखालील विश्वचषक विजयाचा प्रवास येणार सर्वांसमोर; ‘८३’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज