भारत विरुद्ध इंग्लंडच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला चेन्नई येथील पहिल्या कसोटीने सुरुवात झाली आहे. मात्र पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला अनपेक्षितपणे पराभवाचे तोंड पहावे लागले. अनुभवाची कमतरता असूनही इंग्लंडच्या संघाने दमदार कामगिरी करत या सामन्यात विजय मिळवला.
त्यामुळे भारतीय संघावर सगळ्याच आघाड्यांवरील निर्णयांचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. यात काही खेळाडूंच्या निवडीच्या निर्णयाचाही समावेश आहे. भारतीय संघाने पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठीच आपला संघ जाहीर केला होता. मात्र या संघातील तीन खेळाडूंना शेवटच्या दोन सामन्यांसाठी संधी मिळणे मात्र कठीण आहे. आजच्या या लेखात आपण याच तीन खेळाडूंचा आढावा घेणार आहोत.
१) शाहबाज नदीम –
डावखुरा फिरकीपटू शाहबाज नदीमला अक्षर पटेल दुखापतग्रस्त झाल्याने पहिल्या कसोटी सामन्यात संधी मिळाली होती. मात्र या सामन्यात तो अतिशय महागडा ठरला होता. त्याने ५९ षटके गोलंदाजी करताना तब्बल २३३ धावा दिल्या होत्या. तसेच इतर गोलंदाजांनी निर्माण केलेला दबाव कायम राखण्यात त्याला अपयश आले होते. त्यामुळेच उर्वरित सामन्यातून भारतीय संघ व्यवस्थापन वगळण्याचीच शक्यता जास्त आहे.
२) वाॅशिंग्टन सुंदर –
वाॅशिंग्टन सुंदर मुख्यतः गोलंदाजी अष्टपैलू म्हणून संघात सामील करण्यात आला होता. मात्र त्याला गोलंदाजीत विशेष चमक दाखवण्यात अपयश आले होते. नदीमप्रमाणेच इंग्लंडच्या फलंदाजांवर दबाव कायम ठेवण्यात सुंदरलाही अपयश आले, असे स्पष्ट मत कर्णधार विराट कोहलीने पहिल्यासामन्यानंतर व्यक्त केले होते. त्यामुळे फलंदाजीत चांगली कामगिरी केली असली, तरीही शेवटच्या दोन कसोटी सामन्यात त्याला संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे.
३) मोहम्मद सिराज –
युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील विजयाचा प्रमुख शिल्पकार होता. मात्र इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत प्रमुख गोलंदाजांचे पुनरागमन झाल्याने त्याला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. पहिल्या कसोटीत इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना भारताने संधी दिली होती. तर उर्वरित सामन्यात मोहम्मद शमी देखील संघात परत येण्याची शक्यता असल्याने मोहम्मद सिराजला संधी मिळण्याची शक्यता धूसर आहे.
महत्वाच्या बातम्या:
दुसर्या कसोटीतून रोहित, रहाणेसह हा खेळाडू होणार आउट कर्णधार कोहली कठोर निर्णय घेण्याची शक्यता
महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पुणे शहर संघाची निवड चाचणी या दिवशी होणार
बिग ब्रेकिंग! भारताविरुद्धच्या आगामी टी२० मालिकेसाठी १६ सदस्यीय इंग्लंड संघाची घोषणा