रांची। आजपासून (19 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टे़डीयम, रांची येथे सुरु झाला आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र या सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली असून भारताने पहिल्या 3 विकेट्स 16 षटकांच्या आतच गमावल्या आहेत. भारताने पहिली विकेट सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालची गमावली.
अगरवालला पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कागिसो रबाडाने बाद केले. 10 धावांवर असताना अगरवालचा झेल तिसऱ्या स्लीपमध्ये उभ्या असणाऱ्या डीन एल्गारने घेतला.
त्यानंतर 9 व्या षटकात रबाडानेच चेतेश्वर पुजाराला पायचीत केले. यावेळी सुरुवातीला पंचानी पुजाराला नाबाद दिले होते पण दक्षिण आफ्रिकेने लगेचच रिव्ह्यू घेतला. यामध्ये पुजारा बाद असल्याचे दिसले. त्यामुळे भारताला पुजाराच्या विकेट बरोबर दुसरा धक्का बसला. पुजारा शून्य धावेवर बाद झाला.
यानंतर सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांची भागीदारी रंगेल असे वाटत असतानाच विराटची विकेट गेली.
विराटला एन्रीच नॉर्जेने पायचीत केले. यावेळी पंचानी बाद दिल्यानंतर विराटने रिव्ह्यू घेतला होता. मात्र रिव्ह्यूमध्ये पंचांचा निर्णय(अंपायर डिसिजन) असे दाखवल्यावर विराटला ड्रेसिंग रुममध्ये परतावे लागले. विराटने 12 धावा केल्या.
विराट बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे रोहितबरोबर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला आहे. विराटची विकेट गेली त्यावेळी भारताने 15.3 षटकात 3 बाद 39 धावा केल्या होत्या.