कानपूर कसोटीत भारतीय संघाच्या हातून विजय निसटला. ९ विकेट्स घेणाऱ्या भारतीय संघाला शेवटच्या ५२ चेंडूंमध्ये न्यूझीलंडची शेवटची विकेट घेता आली नाही. यासोबतच न्यूझीलंड संघाने पहिली कसोटी अनिर्णित राखली. या कसोटी सामन्यात श्रेयस अय्यरने शानदार शतक केले. या उत्कृष्ट कामगिरीनंतर श्रेयसला आता मुंबई कसोटीत स्थान मिळणार का? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. खराब फॉर्म असूनही अजिंक्य रहाणेला मुंबई कसोटीत स्थान मिळेल का? या प्रश्नांची उत्तरांचे संकेत प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिले आहेत.
मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सोमवारी (३० नोव्हेंबर) सांगितले की, कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे, स्वत: मोठी धावसंख्या करून लय शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच्यासाठी ही फक्त एक डावाची बाब आहे आणि लयीत परतेल. नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करणाऱ्या रहाणेने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत ३५ आणि ४ धावा केल्या. यावर्षी १२ कसोटी सामन्यांमध्ये त्याची सरासरी २० पेक्षा कमी आहे.
रहाणेची लय संघासाठी चिंतेचे कारण आहे का? असे द्रविडला विचारले असता, तो म्हणाला, ‘याबाबत फार काळजी करण्याची गरज नाही. साहजिकच अजिंक्य रहाणेने संघासाठी अधिक धावा केल्या पाहिजेत, त्यालाही तेच करायला आवडेल. रहाणे हा प्रतिभावान खेळाडू आहे आणि त्याने यापूर्वी भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे. तो अशा लोकांपैकी एक आहे ज्यांच्याकडे कौशल्य आणि अनुभव या दोन्ही गोष्टी आहेत. ही फक्त एका सामन्याची बाब आहे, त्याला ते माहित आहे आणि आम्हालाही ते समजते.’
मुंबईतील पुढील कसोटीत कर्णधार कोहली पुनरागमन करत असताना, रहाणेला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यासाठी श्रेयस अय्यरला वगळले जाईल का? द्रविड म्हणाले, ‘आम्ही आमची प्लेइंग इलेव्हन कोणती असेल हे ठरवलेले नाही आणि ते खूप घाईचे ठरेल. निदान आज तरी आमचे लक्ष्य या सामन्यावर होते. आम्ही मुंबईला गेल्यावर परिस्थितीचा आढावा घेऊ आणि खेळाडूंचा फिटनेस तपासू. विराट कोहलीही सहभागी होणार असल्याने त्याच्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल.’
महत्त्वाच्या बातम्या –
कोलकाताचे रिटेन केले ‘हे’ नाईट रायडर्स; कर्णधार ओएन मॉर्गनला नारळ
रॉयल्सची अशी असणार रिटेन्शन रणनिती; स्टार खेळाडूंना केले जाणार मुक्त