धरमशाला। भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात रविवारी (२७ फेब्रुवारी) टी२० मालिकेतील (T20I Series) तिसरा सामना (3rd T20I) खेळवला जाणार आहे. हा सामना हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (HPCA Stadium) होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.०० वाजता सुरुवात होणार आहे.
या सामन्याच्या निकालाने मालिकेच्या विजेत्यावर परिणाम होणार नाही. कारण, या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाच्या अंतिम ११ जणांच्या संघात बदल होण्याची दाट शक्यता आहे. कर्णधार रोहित शर्माने देखील दुसऱ्या टी२० सामन्यानंतर संघात बेंचवरील खेळाडूंनाही संधी दिली जाणार असल्याचे संकेत दिले होते.
दरम्यान, दुसऱ्या टी२० सामन्यात लहिरू कुमाराचा वेगवान बाउंसर इशान किशनच्या डोक्याला लागला होता. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्येही दाखल करावे लागले. याच कारणामुळे इशान तिसऱ्या टी२० सामन्यात न खेळण्याची शक्यता आहे. तो जर तिसऱ्या टी२० सामन्यात खेळला नाही, तर रोहितबरोबर सलामीला कोण फलंदाजी करणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सध्यातरी भारताकडे सलामीसाठी संजू सॅमसन, मयंक अगरवाल आणि वेंकटेश अय्यर हे पर्याय आहेत. अशात इशानऐवजी मयंकला संधी दिली जाऊ शकते आणि वेंकटेशला नेहमीप्रमाणेच मधल्या फळीत खेळवले जाऊ शकते. याबरोबरच प्रयोग करण्याच्या हेतूने रोहितही मधल्या फळीत फलंदाजीसाठी उतरू शकतो. तसेच सॅमसन आणि मयंक यांची जोडी सलामीला उतरू शकते. मयंकचा दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडलेल्या ऋतुराज गायकवाड ऐवजी १६ जणांच्या भारतीय संघात समावेश करण्यात आला होता.
गोलंदाजीचा विचार करायचा झाल्यास मोहम्मद सिराज आणि रवी बिश्नोई यांना अंतिम ११ जणांच्या संघात सामील केले जाऊ शकते. तसेच आवेश खानलाही हर्षल पटेलऐवजी संधी दिली जाण्याची शक्यता आहे. भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल यांना विश्रांती दिली जाऊ शकते.
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यासाठी भारताचा संभावित ११ जणांचा संघ
संजू सॅमसन (यष्टीरक्षक), मयंक अगरवाल, रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, रविंद्र जडेजा, दीपक हुडा, हर्षल पटेल, आवेश खान, जसप्रीत बुमराह, रवी बिश्नोई.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठ्या मिशा, खांद्यावर रूमाल, आयपीएलपूर्वी ‘रजनीकांत’ स्टाईलमध्ये दिसला धोनी; व्हिडिओ आहे चर्चेत
श्रीलंकेविरुद्धचा दुसरा टी२० सामना जिंकूनही कर्णधार रोहित शर्मा नाराज, ‘हे’ आहे मोठे कारण
‘धरमशालातील सामना दुपारी चारला खेळवा’, भारतीय दिग्गजाचा कारणासह सल्ला