भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेली बॉर्डर- गावसकर ट्रॉफी सीरिज भारताने २-१ ने जिंकत कसोटी इतिहासात सुवर्णाक्षराने या विजयाची नोंद केली. या मालिकेतील मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या सामन्यातून कसोटी पदार्पण करणाऱ्या युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने आपल्या गोलंदाजीने सर्वच क्रिकेट पंडितांची वाहवा मिळवली. मात्र, सिराजच्या या यशामागे मोठे बलिदान दडलेले होते.
या सामन्याच्या काही आठवड्यांपूर्वीच सिराजच्या वडिलांचे निधन झाले होते. या दुःखद परिस्थितीत देखील त्याने मायदेशात न परतता भारतीय संघासाठी खेळण्याचा निर्णय घेतला होता.
अनुभवी भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीला झालेल्या दुखापतीमुळे सिराजला मेलबर्न येथे आपले कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात त्याने २ फलंदाजांना बाद केले. सिराजने पहिल्या डावात लाब्यूशानेचा घेतलेला बळी हा सामन्याला कलाटणी देणारा ठरला. सिराजच्या या कामगिरीने भारतीय संघात नव्या जोशाची निर्मिती झाली होती. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातदेखील सिराजने उत्तम गोलंदाजी करत ३ फलंदाजांना बाद केले. सिराजच्या या कामगिरीमुळे समालोचन करत असलेले ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅग्रा विशेष प्रभावित झालेले दिसले.
त्यानंतर ब्रिस्बेन येथे झालेला चौथा कसोटी सामना सिराजने अविस्मरणीय बनवला. या सामन्यातील दुसर्या डावात ५ विकेट्स घेत त्याने सामन्याचा कायापालट केला आणि सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना झाले वडीलांचे निधन
सिराज भारतीय संघासह आयपीएल २०२० नंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गेला होता. पण या दौऱ्यातील क्वारंटाईन कालावधीदरम्यानच त्याला वाईट बातमी मिळाली. ती बातमी म्हणजे २० नोव्हेंबरला त्याच्या वडीलांचे निधन झाले. ते काही काळापासून फुफ्फुसाच्या आजाराने ग्रस्त होते. मात्र, सध्या भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियामध्ये असलेला सिराजने वडिलांच्या निधनानंतरही भारतात न परतण्याचा निर्णय घेतला. त्याने ठरवले की आपल्या वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करायचे.
यानंतर तो वडीलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्याच जिद्दीने मैदानात उतरला आणि फक्त उतरला नाही तर भारताच्या ऐतिहासिक विजयात मोलाचा वाटाही त्याने उचलला.
सिराजचे वडील रिक्षाचालक होते. त्यांनी बेताचीच असणारी आर्थिक परिस्थिती सांभाळत सिराजला क्रिकेटपटू बनवण्यासाठी जमेल ते प्रयत्न केले होते. भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेट खेळण्याची आपल्या दिवंगत वडिलांचे स्वप्न पूर्ण केल्यानंतर मायदेशी आल्यावर सिराज सर्वात पहिल्यांदा स्मशानभूमीत गेला आणि आपल्या दिवंगत वडिलांच्या थडग्यावर (कब्र) पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
आईनेही दिला होता सल्ला
सिराजने आपल्या आईशी झालेल्या संवादाबद्दल सांगताना म्हटले होते की, “अम्मीने मला सांगितले, प्रत्येकाला एक ना एक दिवस हे जग सोडून जावे लागते. तू तिथेच रहा आणि वडिलांचे स्वप्न पूर्ण कर.”
आपल्या जन्मदात्या आई-वडिलांच्या स्वप्नाला सत्यात उतरवणारा सिराज आज (१३ मार्च) २७ वर्षांचा झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“अरे अजिंक्य दादा, शुबमनला ३० धावा करू द्यायच्या ना, म्हणजे…” ऑस्ट्रेलियन अँकरची रहाणेकडे खास मागणी
साधं अर्धशतकही करता आलं नाही! तब्बल ३२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत घडलंय ‘असं’