जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये समावेश होणाऱ्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना आयपीएल २०२२मध्ये अपेक्षित कामगिरी करता आली नाही. मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा माजी कर्णधार यांच्यासाठी आयपीएल २०२२ निराशाजनक राहिले. विराटने तरी ३४१ धावा चोपल्या. मात्र, अनेक सामन्यांमध्ये त्याची बॅट शांतच होती. दुसरीकडे, रोहित शर्मा याचीही बॅट संपूर्ण हंगामात संघर्ष करताना दिसली. अशात या दोन्ही खेळाडूंच्या फॉर्मबद्दल चमिंडा वास याने मोठे वक्तव्य केले आहे.
श्रीलंका संघाचा माजी गोलंदाज चमिंडा वास याने रोहित आणि विराट यांच्या फॉर्मविषयी बोलताना म्हटले की, त्यांना विश्रांती दिली पाहिजे. त्याचा असा विश्वास आहे की, खराब फॉर्मचा सामना करणाऱ्या या दोन्ही खेळाडूंना विश्रांतीची गरज आहे. यासोबतच त्याने म्हटले की, आयपीएल कामगिरीवरून या दोघांचेही मुल्य ठरवले नाही पाहिजे.
‘रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांतीची गरज’
चमिंडा वास म्हणाला की, रोहित आणि विराट यांच्यासाठी आयपीएल २०२२चा हंगाम चांगला राहिला नाही. मात्र, याच्या आधारावर टी२० विश्वचषकाच्या प्रदर्शनावर चर्चा करणे योग्य नाहीये. तरी, विराटने काही सामन्यात धावा केल्या. तो म्हणाला की, “रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही मॅचविनर आहेत. दोन्ही दिग्गज खेळाडूंना टी२० विश्वचषकापूर्वी विश्रांती देण्यात यावी, असे मला वाटते. असे केल्याने दोन्ही खेळाडू ताजेतवाने होतील. तसेच, ते पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक होतील. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी कशी असेल, हे या दोन खेळाडूंवर अवलंबून असेल, असेही वास म्हणाले. श्रीलंकेच्या माजी दिग्गजाने सांगितले की, रोहित शर्मा आणि विराट कोहलीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. चांगला निर्णय आहे.”
कर्णधार म्हणूनही फ्लॉप राहिला रोहित शर्मा
मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मासाठी हा हंगाम खूपच खराब राहिला. त्याने या हंगामात १४ सामने खेळताना फक्त १९.१४च्या सरासरीने २६८ धावा चोपल्या. या धावा करताना त्याचा स्ट्राईक रेट हा १२०.१७ इतका होता. यादरम्यान रोहित एकही अर्धशतक झळकावू शकला नाही. दुसरीकडे कर्णधार म्हणूनही रोहित फ्लॉप ठरला. त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाला हंगामातील सुरुवातीचे सलग ८ सामने गमवावे लागले. दुसरीकडे, विराट कोहलीने या हंगामात १६ सामने खेळताना ३४१ धावा चोपल्या. या धावा करताना त्याची सरासरी २२.७३ आणि स्ट्राईक रेट ११५.९८ इतका होता. यादरम्यान विराटला फक्त २ अर्धशतक झळकावण्यात यश आले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जल्लोष तर होणारच! १४ वर्षांनी आयपीएल फायनलला पोहचलेल्या राजस्थानचे ‘रॉयल’ सेलिब्रेशन
सामना हरला, पण मनं जिंकली! विराटने केले असं काही की होतंय सर्वत्र कौतुक; पाहा Video