भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मैदानातील त्याच्या शांत स्वभावातून घेणाऱ्या अनोख्या निर्णयामुळे ‘कॅप्टनकूल’ म्हणून ओळखला जायचा. मात्र भारताचा सध्याचा कर्णधार विराट कोहली याच्या पुरता उलट आहे. विराट कोहली मैदानावर त्याच्या आक्रमकपणासाठी ओळखला जातो. त्याच्या आक्रमक स्वभावातून तो त्याचे क्रिकेटबद्दलचे असलेले प्रेम बिनधास्तपणे व्यक्त करतो. कोहलीचा असा आक्रमक अंदाज त्याच्या चाहत्यांसोबतच अनेक दिग्गज खेळाडूंना देखील खूप आवडतो.
त्यातीलच एक नाव म्हणजे भारताचे माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनियर. फारुख यांनी कोहलीच्या आक्रमक स्वभावचे कौतुक केले. मात्र, कधीकधी कोहली अति आक्रमक होत असल्याचे देखील यावेळी ते म्हणाले.
इंडिया टुडे सोबत बोलताना फारुख इंजिनियर म्हणाले, “मला कोहलीचे खूप कौतुक आहे. तो एक आक्रमक कर्णधार आहे. तसे पाहायला गेले, तर आक्रमक असणे चांगले आहे. मात्र, यालादेखील काही मर्यादा असल्या पाहिजेत. नाहीतर सामन्याचे पंच यामध्ये हस्तक्षेप करू शकतात. कोहलीने त्याचा आक्रमकपणा थोडासा कमी करावा. कधीकधी तो अति आक्रमक होऊन जातो. मात्र, मला त्याची ही आक्रमकता रास्त वाटते. तो एक अत्यंत उत्कृष्ट कर्णधार आहे. त्याचबरोबर तो जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असा फलंदाज आहे.”
“ज्यावेळी आम्ही क्रिकेट खेळायचो, तेव्हा विरोधी संघातील खेळाडू आम्हाला ‘ब्लडी इंडियन्स’ म्हणायचे. मात्र, याला मी माझ्या फलंदाजीने उत्तर द्यायचो. ते आमच्या बोलण्याच्या पद्धतीवर देखील चेष्टा करायचे. नंतर सर्व विरोधी संघांना हळूहळू भारतीय क्रिकेटची ताकत दिसून आली, यावरून त्यांना कळाले की भारतीय संघ कोणत्याही क्षेत्रात त्यांच्यापेक्षा कमी नाही.” असेही ते यावेळी म्हणाले.
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील कसोटी मालिकेबद्दल देखील फारूख यांनी आपले मत व्यक्त केले. त्यांच्या मते, सुर्यकुमार यादवला तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाच्या अंतिम ११ मध्ये संधी मिळायला हवी. सूर्यकुमार यादव संघासाठी धावा करण्याची गती राखून ठेवण्यास मदत करू शकतो. तसेच त्याची खेळण्याची शैली देखील उत्कृष्ट असल्याचे देखील यावेळी त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी दुसऱ्या कसोटी सामन्यात मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी ९ व्या विकेटसाठी केलेल्या भागीदारीचे देखील कौतुक केले.
दरम्यान, इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ ०-१ आघाडीवर आहे. लॉर्ड्सच्या मैदानावरील विजयानंतर भारतीय संघाला चांगली ऊर्जा प्राप्त झाली असेल. त्यामुळे भारतीय संघ तिसऱ्या कसोटी सामन्यात देखील विजय मिळवण्याच्या तयारीत असेल. तर इंग्लंडचा संघ तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका बरोबरीत आणण्याच्या प्रयत्नात असेल.
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना बुधवारीपासून (२५ ऑगस्ट) लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–अष्टपैलू हार्दिक पंड्याला टी२० विश्वचषकात मिळणार का संधी? गोलंदाजी प्रशिक्षकाने दिले उत्तर
–धोनी आणि रैनाच्या उपस्थितीत सीएसकेच्या मॅनेजरचा वाढदिवस जोरदार साजरा,पाहा व्हिडिओ
–आयपीएलमध्ये देखील ‘द हंड्रेड’च्या ‘या’ नियमाला लागू केले पाहिजे, माजी इंग्लिश खेळाडूचा सल्ला