भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. यजमान इंग्लंडविरुद्ध ब्रिस्टल येथे सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्यावर इंग्लंडने चांगलीच पकड मिळवली. इंग्लंडने पहिल्या डावात ३९६ धावा उभारल्यानंतर त्याच्या प्रत्युत्तरात, भारतीय सलामीवीरांनी दिडशतकी सलामी दिल्यानंतरही भारताचा डाव अवघ्या २३१ धावांमध्ये संपुष्टात आला. पहिल्या गड्यासाठी १०० पेक्षा अधिक धावांची भागीदारी केल्यानंतर ही भारताने उभारलेली ही सर्वांत नीच्चांकी धावसंख्या आहे. भारतीय संघाचे सर्व फलंदाज केवळ ६४ धावांमध्ये बाद झाले.
स्मृती-शेफालीची विक्रमी भागीदारी
भारतीय संघासाठी स्मृती मंधाना व पदार्पणवीर शेफाली वर्मा यांनी सलामी दिली. इंग्लंडच्या अनुभवी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत त्यांनी वैयक्तिक अर्धशतके पूर्ण केली. शतकाचा नजीक असताना शेफाली ९६ धावांवर बाद झाली. दोघींनी भारताला १६७ धावांची सलामी दिली. जी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधील भारतीय संघासाठीची सर्वोत्तम सलामी आहे.
भारतीय संघाची घसरगुंडी
शेफाली बाद झाल्यानंतर स्मृती ७८ धावांवर तंबूत परतली. स्मृती बाद झाली तेव्हा संघाची धावसंख्या १७९ अशी होती. मात्र, त्यानंतर भारतीय संघाची आश्चर्यकारक घसरगुंडी झाली. पूनम राऊत (२), कर्णधार मिताली राज (२) व शिखा पांडे शून्य धावा काढून तंबूत परतल्या. दुसऱ्या दिवसाखेर भारताचा डाव ५ बाद १८७ धावांवर थांबला होता.
तिसऱ्या दिवशीही पडझड
दुसऱ्या दिवशीचे नाबाद फलंदाज हरमनप्रीत कौर व दिप्ती शर्मा डाव सावरतील अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, दुसऱ्या दिवशीच्या धावसंख्येत एकही धावांची भर न घालता हरमनप्रीत कौर आणि तानिया भाटिया माघारी परतले. पदार्पण करणाऱ्या स्नेह राणा केवळ २ धावा करू शकली. दिप्ती शर्माने पुजा वस्त्रकारला साथीला घेत नवव्या गड्यासाठी ३३ धावांची भागीदारी केली. पुजा व झुलन गोस्वामी लागोपाठ बाद झाल्याने भारताचा डाव २३१ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडसाठी फिरकीपटू सोफी एकलस्टनने सर्वाधिक चार तर, कर्णधार हीदर नाईटने दोन गडी बाद केले.
महत्वाच्या बातम्या:
वनडे विश्वचषकात सर्वात वेगवान शतक झळकावणाऱ्या फलंदाजाने केली निवृत्तीची घोषणा
पृथ्वी शॉच्या बेडवर मिळाली ही वस्तू; चाहत्यांनी केले जोरदार ट्रोल
चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७: क्रिकेटच्या मैदानावर पाकिस्तानने भारताला दिलेली सर्वात ताजी जखम