भारत विरुद्ध बांगलादेश संघातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने उत्तम कामगिरी करत तिसऱ्याच दिवशी 1 डाव आणि 130 धावांनी विजय मिळवला आहे. भारताकडून पराभूत झाल्यानंतर बांगलादेशी प्रशिक्षक रसेल डोमिंगोने संघाची एकूण रचना सुधारण्यावर लक्ष देणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.
संघाला तिसर्या वेगवान गोलंदाजाची आवश्यकता आहे. जो 7 व 8 व्या क्रमांकावर फलंदाजी करू शकेल आणि संघाला संतुलन प्रदान करेल, असे डोमिंगो म्हणाले.
‘संघाची रचना बदलण्याची गरज आहे यात काही शंका नाही. अन्यथा निकाल असाच राहील. मला निवडकर्त्यांसोबत बसून पुढे असलेल्या रणनीतीचा विचार करण्याची गरज आहे. जे संघ पुढे घेऊन जाऊ शकतात अशा खेळाडूंची ओळख मला होणे आवश्यक आहे,’ असे डोमिंगो म्हणाले.
‘आमच्या संघात बरेच महान खेळाडू आहेत आणि त्यांचा सन्मान होणे आवश्यक आहे, परंतु त्याचबरोबर आम्हाला संघाच्या हिताचे निर्णय घेण्याची देखील गरज आहे,’ असेही प्रशिक्षक म्हणाले.
‘दोन वेगवान गोलंदाजांसोबत खेळणे खूप अवघड आहे. आम्हाला तिसरा वेगवान गोलंदाज आवश्यक आहे, जो फलंदाजीही करू शकेल. सैफुद्दीनला दुखापत झाली आहे. परंतु संघाच्या संरचनेकडे लक्ष देणे आवश्यक आहे.’ असे डोमिंगो म्हणाले.