भारताचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव मागील काही महिन्यांपासून दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर आहे. त्यामुळे आता तो पुन्हा भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी मेहनत घेत आहे.
त्याला आयपील 2018 च्या पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याच्यावर मेलबर्नमध्ये शस्त्रक्रियाही करण्यात आली.
आता या शस्त्रक्रियेनंतर तो 2-3 आठवड्यात पून्हा क्रिकेट खेळायला सुरु करेल असे त्याने सांगितले आहे. याचबरोबर केदारने भारताचा कर्णधार विराट कोहलीबद्दल बोलताना त्याचे कौतुकही केले आहे.
तो विराटबद्दल बोलताना म्हणाला दुखापतीच्या या कठिण काळात विराटने त्याला पाठिंबा दिला होता.
केदार पुढे म्हणाला, “फक्त या काळातच नाही तर जेव्हापासून मी संघात खेळत आहे तेव्हापासून विराट पाठिंबा देत आहे. मला आठवते की जेव्हा माझी पहिल्यांदा भारतीय संघात निवड झाली होती तेव्हा विराटने मला ब्लॅकबेरी फोन भेट म्हणून दिला होता.”
“विराट नेहमीच कर्णधार म्हणून तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देत असतो. तसेच तो मैदानाबाहेर प्रेमळ आणि काळजी घेणारा व्यक्ती आहे”
त्याचबरोबर केदारने सांगितले की शस्त्रक्रियेनंतर आता त्याला फलंदाजी करण्याची परवानगी दिली आहे, परंतू पावसामुळे त्याला फलंदाजी करण्यात अडचण येत आहे. त्यामुळे तो पुढील दोन आठवड्यात फलंदाजीला सुरुवात करेल.
तसेच त्याने सांगितले याआधीही 2-3 वेळा त्याला या दुखापतीला सामोरे जावे लागले असल्याने डॉक्टर आणि फिजीओने सांगितले होते की जर आणखी काही काळ क्रिकेट खेळायचे असेल तर शस्त्रक्रिया करुन घे.
याबरोबरच केदार म्हणाला, या दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यात खेळता न आल्याने तो निराश झाला होता. पण दुखापत ही खेळाचा भाग असल्याने तो यावर काही करु शकत नाही.
महत्त्वाच्या बातम्या:
–सर व्हिव रिचर्ड्स यांना मागे टाकत या पाकिस्तानी फलंदाजाने रचला विश्वविक्रम
–संघ निवडीसाठी यो-यो हा एकमेव निकष असू शकत नाही -सचिन तेंडुलकर