बांगलादेशचा माजी कर्णधार आणि कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार अष्टपैलू शाकिब उल हसनला यावर्षी केकेआर कायम करण्याची शक्यता कमी आहे. शाकिब गेले ७ वर्ष या संघाचा सदस्य राहिला आहे.
मेडियामधील काही रिपोर्ट्सप्रमाणे आयपीएल २०१८मध्ये केकेआर व्यवस्थापन शाकिबला कायम ठेवण्यासाठी उत्सुक नाही. १०व्या मोसमात शाकिब उल हसन हा एकच सामना खेळला होता. आज खेळाडूंना संघात कायम ठेवण्याची घोषणा करण्याची अंतिम तारीख आहे.
याबद्दलच्या बातम्या ह्या बांग्लादेशच्या वृत्तपत्रांमध्येही झळकल्या आहे.
आयपीएलच्या दोन वेळच्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघात मोठे खेळाडू आहेत. त्यामुळे आता हा संघ कोणत्या खेळाडूंना कायम ठेवणार हा प्रश्न आहे. खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी त्यांना काही कठीण निर्णय घ्यावे लागणार आहेत.
यावर्षीच्या आयपीएल रिटेनेशन पॉलिसीनुसार कोणत्याही संघांना ५ खेळाडू कायम ठेवता येणार आहे. त्यासाठी लिलावापूर्वी आणि आणि लिलावात राइट टू मॅच वापरून जास्तीतजास्त ५ खेळाडू संघात कायम ठेवता येऊ शकतात.
यानुसार कोलकाताला त्यांच्याकडे असणाऱ्या गौतम गंभीर, आंद्रे रसल, मनीष पांडे, रॉबिन उथप्पा, सुनील नरिन, कुलदीप यादव, युसूफ पठाण, शाकिब अल हसन, नॅथन कुल्टर नाईल, उमेश यादव, ट्रेंट बोल्ट, ख्रिस लिन आणि ख्रिस वोक्स यांसारख्या मोठ्या खेळाडूंमधून ५ खेळाडू संघात कायम ठेवण्यासाठी कसरत करावी वागणार आहे.
यामध्ये कोलकाता लिन, रसेल,सुनील नरिन आणि उथप्पा यांपैकी ३ खेळाडू कायम ठेवण्याची शक्यता आहे. यामध्ये दोन वेळा ज्याच्या नेतृत्वाखाली कोलकाताच्या संघाने आयपीएल जिंकले आहे त्या गौतम गंभीरला संघात कायम ठेवण्याची शक्यता खूप कमी आहे आणि जर असे झाले तर सर्वांसाठी तो आश्चर्याचा धक्का असेल.
गौतम गंभीर नुकत्याच पार पडलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत दिल्लीकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. तसेच दिल्ली संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवण्यात त्याने महत्वाचा वाटा उचलला आहे.
याबरोबरच कोलकाता आयपीएल लिलावात राईट टू मॅच कार्ड वापरून पांडे, कुलदीप,कुल्टर नाईल किंवा बोल्ट यांच्यापैकी खेळाडूंना संघात कायम ठेवण्याची शक्यता आहे.
२७ आणि २८ जानेवारीला आयपीएलच्या ११ व्या मोसमासाठी लिलाव होणार आहे. तसेच उद्या आयपीएल संघ त्यांचे कोणते खेळाडू कायम ठेवणार आहेत हे जाहीर करतील.