आयपीएलच्या ११ व्या मोसमाचा लिलाव दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. यात अनेक तरुण खेळाडूंना चांगली बोली लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे माजी कर्णधार राहुल द्रविडने १९ वर्षांखालील भारतीय संघाला विचलित होऊ नका असा सल्ला दिला आहे. द्रविड या भारतीय संघाचा प्रशिक्षक आहे.
१९ वर्षांखालील भारतीय संघ सध्या न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकात व्यस्त आहे. भारतीय संघाने उत्तम कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. उद्या त्यांचा बांग्लादेशबरोबर उपांत्यपूर्व फेरीचा सामना रंगणार आहे.
याच भारतीय संघातील अनेक खेळाडूंची नावे आयपीएल लिलावाच्या यादीत घोषित करण्यात आलेली आहेत. याबदल ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना द्रविड म्हणाला, “सत्य लपवण्यात काही अर्थ नाही. हे खरं आहे.” तसेच द्रविड असेही म्हणाला की आयपीएल लिलाव नाही हे भासवण्यातही काही अस्र्थ नाही त्यापेक्षा आम्ही यावर चर्चा करतो.
द्रविड पुढे म्हणाला, “आम्ही या खेळाडूंचा फोकस कशावर हवा आणि त्यांचे जवळच्या ध्येयाच्या तुलनेत लांब पल्ल्याचे ध्येय काय असावे यावर चर्चा करतो”
द्रविडने विश्वचषकाचे महत्व समजावून देताना सांगितले की आयपीएल लिलाव हा दरवर्षी येणार आहे, पण विश्वचषकात खेळण्याची संधी प्रत्येकालाच मिळते असे नाही. याबद्दल पुढे द्रविड म्हणाला, “लिलाव अशी एक गोष्ट नाही की ज्यावर खेळाडू नियंत्रण ठेवू शकतात. एक किंवा दोन लिलाव खेळाडूंच्या दीर्घ कारकिर्दीवर जास्त परिणाम करू शकत नाही.”
“लिलाव प्रत्येक वर्षी असणार आहे. पण त्यांना प्रत्येकवर्षी शक्य झाल तर विश्वचषक उपांत्य फेरीत भारताकडून खेळण्याची संधी मिळेलच असे नाही. असे नेहमी होत नाही.”
१९ वर्षांखालील भारतीय संघाने २०१६ च्या विश्वचषकात द्रविडांच्याच प्रशिक्षणाखाली अंतिम सामन्यात धडक मारली होती.