मुंबई । भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतवर स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सात वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्याचा हा शिक्षेचा कालावधी आता लवकरच संपत असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी तयारी करत आहे.
बीसीसीआयचे लोकपाल डी. के. जैन यांनी मागील वर्षी श्रीसंतवरील शिक्षा कमी करुन आजीवन प्रतिबंधऐवजी सात वर्षांची शिक्षा दिली.
आयपीएल 2013 साली राजस्थान रॉयल संघातील श्रीसंतचा सहकारी आणि स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सामील असलेला अंकित चव्हाण यावर आजीवन क्रिकेट खेळण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
अंकित चव्हाणने नुकतेच बीसीसीआय आणि मुंबई क्रिकेट संघास एक मेल केला आहे. अंकितने या मेलमध्ये लिहिले की, “श्रीसंत प्रमाणे त्यांच्यावरील शिक्षा कमी करून सात वर्षांची करावी,” अशी मागणी केली आहे.
2013 च्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात राजस्थान रॉयलचे तीन खेळाडू एस.श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंदिला हे दोषी आढळून आले होते. यांच्यावर आजीवन क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्यात आली होती . अंकित हा देखील श्रीसंत प्रमाणे क्रिकेटमध्ये पुनरागमन करू इच्छितो. त्याने त्याची शिक्षा कमी करण्याची मागणी केली आहे.
अंकित चव्हाण पीटीआयशी बोलताना म्हणाला की, “बीसीसीआय जर श्रीशांतवर घालण्यात आलेल्या बंदीवर पुनर्विचार केला असेल तर माझाही बाबतीत पुनर्विचार करावा. पण अंकितला बीसीसीआयकडून कोणतेच प्रत्युत्तर मिळाले नाही. त्यामुळे मी मुंबई क्रिकेट असोसिएशनला देखील मेल केला आहे.”