गोवा| इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) यंदाच्या पर्वातील ५० सामने पार पडले आणि यात १० संघांनी किमान दोन तरी विजय मिळवले आहेत. एससी ईस्ट बंगाल हा एकमेव संघ अद्याप एकही विजय मिळवू शकलेला नाही आणि जेतेपदाच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी त्यांना आता प्रत्येक सामना जिंकावा लागणार आहे. अशात एससी ईस्ट बंगालसमोर शुक्रवारी बलाढ्य मुंबई सिटी एफसीचे आव्हान असणार आहे. आतापर्यंत मुंबईनं सर्वाधिक ५ सामने जिंकलेले आहेत.
ईस्ट बंगालनं २०२२ची सुरुवात चांगली करताना नववर्षातील पहिल्याच लढतीत बंगलोर एफसीला विजयासाठी झुंजवले अन् १-१ अशा बरोबरीवर समाधान मानण्यास भाग पाडले. पण, या निकालाने त्यांचे मनोबल नक्कीच उंचावले आहेत. ९ सामन्यांत ईस्ट बंगालला ५ गुणांची कमाई करून तळाच्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. निराशाजनक कामगिरीमुळे ईस्ट बंगालनं प्रशिक्षक जोस मॅन्यूएल डाएझ यांच्यासोबतचा करार संपुष्टात आणला आणि बंगलोर एफसीविरुद्ध ते प्रभारी प्रशिक्षक रेनेडी सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली खेळले होते.
भारताच्या माजी कर्णधाराच्या नेतृत्वाखाली ईस्ट बंगालचा खेळ उंचावलेला पाहायला मिळत आहे. मागील पर्वापासून रेनेडी हे ईस्ट बंगालचे साहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत आणि प्रशिक्षक म्हणून पहिल्याच सामन्यात त्यांनी बरोबरीचा निकाल मिळवला. सौरव दासच्या स्वयंगोलनं बंगलोर एफसीला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. पण, संपूर्ण लढतीत ईस्ट बंगालचेच पारडे जड होते. ”मागील सामन्यात खेळाडूंचा दमदार खेळ पाहून आनंद झाला. आता आत्मविश्वासानं खेळ करण्याचा आमचा निर्धार आहे. मुंबई सिटी एफसीचा संघ लीगमधील सर्वोत्तम आक्रमणाची धार असलेला संघ आहे. त्यांच्यासाठी हा सामना आम्हाला आव्हानात्मक करायचा आहे. आम्ही त्यांना गोल करण्याची संधी दिली, तर ते ती सोडणार नाहीत,”असे रेनेडी म्हणाले.
दुसरीकडे मुंबई सिटी एफसीला अव्वल स्थान गमवावे लागले आहे. हैदराबाद एफसीनं बुधवारी एटीके मोहन बागानविरुद्धची लढत २-२ अशी बरोबरीत सोडवून अव्वल स्थानावर कब्जा केला. डेस बकींगहॅमच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या मुंबई सिटी एफसीला मागील लढतीत ओडिशा एफसीकडून हार मानावी लागली होती. मागील तीन लढतींत मुंबई सिटीला पराभवाचे दोन धक्के बसले आहेत, तर एक सामना बरोबरीत सुटला आहे. त्यामुळे आता त्यांना खेळात सुधारणा करून पुन्हा विजयपथावर परतण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
‘मागील सामन्यात एक संघ म्हणून आमच्याकडून बऱ्याच चूका झाल्या. मागील तीन सामन्यांत आमची कामगिरी चांगली झालेली नाही, परंतु सर्व ९ सामन्यांचा विचार केल्यास आम्ही चांगला खेळ केला आहे. त्यामुळे आम्हाला सातत्यपूर्ण कामगिरीवर लक्ष केंद्रीत करायला हवं,”असे बकींगहॅम म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
एटीकेच्या डेव्हिड विलियम्सनं सर्वात जलद गोल नोंदवला, पण हैदराबादनं सामना बरोबरीत सोडवला