वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या भारतीय संघाचा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधील आघाडीचा गोलंदाज आहे. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये तो भारताच्या गोलंदाजी आक्रमणाचे समर्थपणे नेतृत्व करतो आहे. सध्या चालू असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेत देखील इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी हे भारताचे दोन प्रमुख गोलंदाज अनुपलब्ध असले तरी बुमराह आपल्या दमदार कामगिरीने संघाला त्यांची उणीव भासू देत नाहिये.
मात्र आता याच संदर्भात भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खानने सावधगिरीचा इशारा दिला आहे. बुमराहवर असलेल्या कामाच्या ताणाचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे मत जहीर खानने व्यक्त केले. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याबाबत चर्चा करताना जहीरने हे मत मांडले.
बुमराहची तंदुरुस्ती महत्वाची
जहीर म्हणाला, “माझ्या मते बुमराह कमी वेळात अधिक षटके टाकतो आहे. त्याला या गोष्टीचा विचार करायला हवा. त्याच्यावर असलेला कामाचा भार हलका करण्याची गरज आहे. आणि विशेषतः जर तुमच्याकडे तीन वेगवान गोलंदाजांसह पाच गोलंदाज उपलब्ध असतील तर दोनच गोलंदाजांकडून अधिक षटके टाकून घेण्यात काहीच अर्थ नाही. माझ्या मते यावर संघ व्यवस्थापनाने लक्ष द्यायला हवे.”
जहीर खानने यापूर्वी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाला प्रशिक्षण देताना जसप्रीत बुमराहसोबत काम केले आहे. त्याच्या मते बुमराहचे भारतीय गोलंदाजी आक्रमणासाठी अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे तो म्हणाला, “बुमराह स्वतःदेखील अधिक षटके टाकण्यासाठी उत्सुक असेल. परंतु भारतीय संघासाठी त्याची तंदुरुस्ती अतिशय महत्वाची आहे, हे देखील त्याने लक्षात घ्यायला हवे.”
त्यामुळे आता जहीर खानच्या या सल्ल्याचा भारतीय संघ व्यवस्थापन गांभीर्याने विचार करणार का, हे पाहणे आता महत्वाचे ठरेल.
संबधित बातम्या:
स्मिथचा रन आउट माझ्यासाठी कारकिर्दीतील अतिशय खास क्षण, रवींद्र जडेजाची प्रतिक्रिया
कॅमरॉन ग्रीनने एकअंगी झुकत पकडला शुबमन गिलचा शानदार झेल, पाहा व्हिडिओ
रिषभ पंतला आपल्या यष्टीरक्षणात सुधारणा करण्याची नितांत गरज