विशाखापट्टणम। बुधवारी(8 मे) आयपीएल 2019 मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघात एलिमिनेटरचा सामना पार पडला. या सामन्यात दिल्लीने हैद्राबादवर 2 विकेट्सने मात केली. त्यामुळे हैद्राबादचे आयपीएल 2019मधील आव्हान संपुष्टात आले.
या सामन्यात हैद्राबादने प्रथम फलंदाजी करत दिल्लीसमोर विजयासाठी 163 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा बचाव करताना 18 व्या षटकापर्यंत हैद्राबादच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत सामन्यात समतोल ठेवला होता.
मात्र 18 व्या षटकात रिषभ पंतने 22 धावा काढत हा सामना दिल्लीच्या बाजूने झुकवला. या षटकात हैद्राबादकडून बासिल थंपीने गोलंदाजी केली होती.
पण अनेकांना हैद्राबादचा कर्णधार केन विलियम्सनने वेगवान गोलंदाज खलील अहमद ऐवजी थंपीला या षटकात गोलंदाजी दिल्याने आश्चर्य वाटले होते. कारण त्याआधी खलीलने 2 षटके गोलंदाजी करताना 17 धावा देत 2 महत्त्वाच्या विकेट्स काढल्या होत्या. तसेच त्याची अजून 2 षटके गोलंदाजी शिल्लक होती.
या निर्णयाबद्दल स्पष्टीकरण देताना विलियम्सन म्हणाला, ‘स्क्वेअर लेग बाऊंड्री लांब होती. तसेच आम्हाला वाटले की डावकरी फलंदाजासाठी उजव्या हाताने गोलंदाजी करणारा गोलंदाज योग्य ठरेल. जो आपल्या कटर्सने फलंदाजाला त्रास देऊ शकतो. पण रिषभ चांगला खेळाडू आहे. त्याने आमच्यावर दबाव टाकला. आम्ही आमच्या शैली योग्यप्रकारे आमलात आणू शकलो नाही.’
या सामन्यात 21 चेंडूत आक्रमक 49 धावांची खेळी करणाऱ्या रिषभ पंतलाच सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. तसेच या सामन्यात दिल्लीने विजय मिळवल्याने त्यांनी क्वाॅलिफायर 2 मध्येही प्रवेश केला आहे.
क्वाॅलिफायर 2 मध्ये त्यांचा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध होणार आहे. या सामन्यात जो संघ विजयी ठरेल तो अंतिम सामन्यात मुंबई विरुद्ध विजेतेपद मिळवण्यासाठी खेळेल.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–आश्चर्यकारक! आयपीएल २०१९ च्या अंतिम सामन्याची तिकीटे संपली केवळ २ मिनिटात
–भारताकडे चौथ्या क्रमांकासाठी हा खेळाडू आहे चांगला पर्याय, दिग्गज क्रिकेटपटूचे मत