सध्या देशभरात विविध शहरांमध्ये रणजी ट्रॉफी 2022-2023 हंगाम सुरू आहे. पुणे येथे सुरू असलेल्या एलिट बी गटातील महाराष्ट्र विरुद्ध आसाम या सामन्यात महाराष्ट्र संघाने आसाम संघाला अक्षरशः लोटांगण घालण्यास भाग पाडले. जवळपास तीन वर्षानंतर प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत असलेला महाराष्ट्राचा अनुभवी फलंदाज केदार जाधव याने आपल्या घरच्या मैदानावर अक्षरशः धावांचा पाऊस पाडताना, वादळी द्विशतकी खेळी केली.
मागील तीन वर्षांपासून भारतीय संघाबाहेर असलेल्या केदार जाधवने बऱ्याच काळापासून देशांतर्गत क्रिकेटपासूनही दूर होता. या सामन्याद्वारे त्याने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. हे पुनरागमन संस्मरणीय बनवताना त्याने आसामच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र 2 बाद 95 अशा स्थितीत असताना केदार खेळपट्टीवर उतरला. त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत धावा जमवल्या. यादरम्यान त्याने आपले शतक पूर्ण केले. दुसऱ्या दिवसाखेर तो 146 चेंडूंवर 142 धावा काढून नाबाद होता. यामध्ये 14 चौकार व 6 षटकार सामील होते.
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा त्याने आपले हेच आक्रमक रूप कायम ठेवले. त्याने केवळ 207 चेंडूंमध्ये आपले दुसरे द्विशतक पूर्ण केले. त्यानंतर धावांचा आणखी वेग वाढवत त्याने त्रिशतकाकडे आगेकूच केली. मात्र, 283 चेंडूवर 21 चौकार व 12 षटकारांच्या मदतीने 283 धावा करत तो माघारी परतला. त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रासाठी सिद्धेश वीर याने शतक ठोकले. महाराष्ट्राने त्यानंतर आपला डाव 9 बाद 594 धावांवर घोषित केला.
केदार 2019 पासून भारतीय संघाबाहेर आहे. तसेच, मागील दोन हंगामापासून त्याच्यावर कोणत्याही आयपीएल संघाने ही बोली लावली नाही. सततच्या दुखापती व खराब फॉर्म यामुळे त्याची कारकीर्द संपल्याचे म्हटले जाते. (Kedar Jadhav Smash 283 In Ranji Trophy Against Assa)