पुणे। गतवर्षी घरच्या मैदानावर बाजी मारल्यानंतर आता गुवाहाटी येथे होणाºया तिसºया खेलो इंडिया स्पर्धेतही महाराष्ट्राचे खेळाडू चमकदार कामगिरी करून दाखवतील असा विश्वास महाराष्ट्राच्या विविध खेळांच्या संघ प्रशिक्षकांनी व्यक्त केला आहे. स्पर्धेसाठी निवड झालेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंचे सराव शिबीर सध्या म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरू आहेत.
या शिबीरादरम्यान महाराष्ट्राच्या कबड्डी, सायकलिंग आणि अॅथलेटिक्स प्रशिक्षकांची संवाद साधला असता त्यांनी सर्व तयारी उत्तम असून, खेळाडू आव्हान पेलण्यास सज्ज असल्याचे सांगितले.
यंदाच्या स्पर्धेत सायकलिंग खेळाचा प्रथमच समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या खेळातील कामगिरीकडे नक्कीच लक्ष लागून राहील.
राज्याच्या प्रशिक्षिका दीपाली पाटिल म्हणाल्या, सायकलिंगचा समावेश प्रथमच होत असला, तरी त्याचे दडपण आमच्या खेळाडूंवर नसेल. आपल्या खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अनुभव असल्यामुळे आपले खेळाडू या स्पर्धेसाठी सज्ज आहेत.
सांघिक विजेतेपदाचे उद्दिष्ट आम्ही बाळगले आहे आणि आम्ही यात यशस्वी होऊ इतका आमचा खेळाडूंच्या क्षमतेवर विश्वास आहे.
सायकलिंगसाठी महाराष्ट्राचे २५ खेळाडूंचे पथक असेल. यात प्रामुख्याने मयूर पवार, अभिषेक काशिद, अश्विन पाटिल, शशिकला आगाशे वैष्णवी गबणे, मयुरी लुटे (२१ वर्षांखालील), आशिष मोरे, रोहित पाटिल, विवान सप्रू, पूजा घातोळे, वैष्णवी पिल्ले, आदिती डोंगरे (१७ वर्षांखालील) या खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे संघातील २५ पैकी बहुतेक खेळाडू क्रीडा प्रबोधिनीतील आहेत.
कसर भरून काढू – बजरंग परदेशी
कबड्डीसाठी या वर्षी महाराष्ट्राच्या मुलांचेच संघ पात्र ठरू शकले आहेत. गेल्यावर्षी मुलांना पदक मिळविण्यात अपयश आले होतो. पण, या वेळी ही कसर भरून काढू असा विश्वास राज्य संघाचे प्रशिक्षक बजरंग परदेशी यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, या वेळी अधिक तगडा संघ आहे. मुख्य म्हणजे पंकज मोहिते, शुभम शिंदे, अस्लम इनामदार, सौरभ पाटिल या प्रो कबड्डीचा अनुभव असणाºया खेळाडूंचा समावेश असल्यामुळे संघाची ताकद वाढली आहे.
राज्याच्या २१ तसेच १७ वर्षांखालील संघातील खेळाडूंना अनुभव असल्यामुळे या वेळी राज्याचे खेळाडू विजयमंचावर दिसून येतील यात शंका नाही.
वर्चस्व राखू -जयकुमार टेंभरे
अॅथलेटिक्स क्रीडा प्रकारात गेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंचा वरचष्मा राहिला होता. या वेळी देखील तो राहिल असे संघाचे प्रशिक्षक जयकुमार टेंभरे यांनी सांगितले. सर्व खेळाडूंची तयारी चांगली झाली आहे.
सध्या सुरू असलेल्या शिबीराबरोबरच काही खेळाडू आंतरविद्यापीठ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे ते चांगल्या टचमध्ये राहतील. याचा फायदाच होणार आहे.
महाराष्ट्राच्या संघात १९ वर्षांखालील गटात खेळणाया प्रकाश गडदे याची २१ वर्षांखालील गटात निवड झाली आहे. जास्तीच्या वयोगटात समावेश झाला असला, तरी त्याच्याकडून संघ प्रशिक्षकांना पदकाची अपेक्षा आहे. या वर्षी त्याने फेडरेशन करंडक स्पर्धेत एक सुवर्ण, एक रौप्य, तर शालेय राष्ट्रीय स्पर्धेत २ सुवर्णपदके मिळवली आहेत.
या खेरीज सिद्धी हिरे,, पूनम सोनुने, ऋजुता शेंडे, पूर्णा रावराणे, ओंकार पन्हाळकर, चेतन चव्हाण, सुदेष्णा शिवणकर या खेळाडूंकडून देखील पदकाची खात्री बाळगता येणार आहे.
खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न- ओम प्रकाश बकोरीया – आयुक्त, महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्रातून ५९० खेळाडूंना सराव शिबिरापासून सर्व खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा पुरविण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्राच्या क्रीडा संचलनालयाने विशेष प्रयत्न केले आहेत. खेळाडूंच्या न्याहारीपासून, जेवणापर्यंत तसेच त्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेतली जात आहे. तसेच या वेळी प्रवासाचा क्षीण जाणवू नये, यासाठी सर्व खेळाडूंना विमानाने आसामला नेण्यात येणार आहे. परतीचा प्रवास देखील असाच सुखकारक राहणार आहे.
पाच फिजीओ तैनात- सुधीर मोरे, उपसंचालक, महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य
सरावासाठी दाखल झालेल्या खेळाडूंच्या तंदुरुस्तीची काळजी घेण्यात येत असून, यासाठी पाच फिजीओ सराव केंद्रावर तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये डॉ. संदीप चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही पाच जणांची टीम काम करत आहे. त्यामुळे अगदी छोटीशी अडचण निर्माण झाली तरी ती तातडीने दूर केली जात आहे. महाराष्ट्राच्या खेळाडूंसोबत गुवाहाटी येथे देखील फिजीओ थेरेपीस्टची टीम जाणार आहे.
पुन्हा एकदा महाराष्ट्राला विजेते पद मिळेल- विजय संतान, चिफ दी मिशन महाराष्ट्र आणि जिल्हा क्रीडा अधिकारी, पुणे
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जवळपास सर्व प्रकारात सहभाग घेतला आहे. महाराष्ट्राचे सर्वात मोठे पथक यंदा सहभागी होणार आहे. अथलेटिकस , बॉक्सिंग आणि स्विमिंगमध्ये महाराष्ट्राचे खेळाडू चांगली कामगिरी करण्याची आशा आहे. खेळाडूंसोबत १७५ सपोर्ट स्टाफ जाणार आहे. मागील वर्षी महाराष्ट्राने २२० पदके मिळविली होती. यापेक्षा चांगली कामगिरी यंदा आम्ही करु, असा विश्वास आहे.