भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांची मालिका (बॉर्डर-गावसकर ट्रॉफी) १७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. भारताचा संघ या मालिकेसाठी पूर्ण तयारीत दिसतोय. मात्र, सामना सुरू होण्यास चार दिवसांचा अवधी शिल्लक असताना, भारताचे सलामीवीर कोण असणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. भारतीय संघाला पडलेला या प्रश्नाचे उत्तर भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याने दिले आहे. नेहराने भारतीय संघाचे दोन सलामीवीर कोण असावेत, याबाबत आपले मत व्यक्त केले.
भारताकडे आहेत भरपूर पर्याय
अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या मालिकेत भारतीय संघासमोर सलामी जोडीचा पेच उभा राहिला आहे. भारताच्या संघात पृथ्वी शॉ, मयंक अगरवाल आणि शुबमन गिल हे नियमित सलामीवीर समाविष्ट आहेत. केएल राहुलने देखिल याआधी कसोटीमध्ये भारतासाठी सलामी दिली आहे. तसेच, अनुभवी रोहित शर्मा अखेरच्या दोन कसोटीसाठी संघात दाखल होईल. त्यामुळे भारतीय कर्णधारापुढे यापैकी सलामीला कोणाला खेळवायचे ? असा पेच निर्माण झाला आहे.
हे असावेत दोन सलामीवीर
आगामी मालिकेत भारताचे सलामीवीर कोण असावेत? या प्रश्नाचे उत्तर देताना भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याने, एका क्रिकेट विषयक संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, “भारताकडे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. मात्र मला विचाराल तर, मी केएल राहुल व मयंक अगरवाल यांना सलामीवीर पाहू इच्छितो. गिल आणि शॉ यांच्यामध्ये भरपूर गुणवत्ता आहे. परंतु, राहुल ज्या फॉर्ममध्ये खेळत आहे ते पाहून भारताची कमजोरी वाटणारा हा विभाग भारताची ताकद बनेल. त्याने याआधी देखील सलामीवीर म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.”
नेहराने सलामीच्या दुसरा पर्याय म्हणून मयंक अग्रवालचे नाव सुचवले. तो म्हणाला, “मला वाटते राहुलसोबत मयंक ने सलामीला उतरावे. मागील दौऱ्यावेळी त्याने पदार्पण केले होते आणि त्याला यशही लाभलेले. तो धावांसाठी भुकेला आहे. मला वाटते, राहुल-मयंक जोडी भारतासाठी काहीतरी खास करेल.”
सराव सामन्यात चमकला होता गिल
कसोटी मालिका सुरू होण्याआधी भारताने ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध दोन सराव सामने खेळले आहेत. त्यातील, दिवस-रात्र सराव सामन्यात शुबमन गिलने ६५ व ४३ धावा काढत आपण फॉर्ममध्ये असल्याचे संकेत दिले आहेत. दुसरीकडे, पृथ्वी शॉ या दोन कसोटीतील तीन डावात अपयशी ठरला आहे. राहुल आणि मयंक हे आयपीएलपासून चांगल्या लयीत खेळतायेत.
संबधित बातम्या:
– भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया संघात मोठ्या खेळाडूचे पुनरागमन; फलंदाजांच्या दांड्या गुल करण्यास सज्ज
– साहा आणि पंतमध्ये कोण असावा पहिल्या कसोटीत यष्टीरक्षक?, माजी दिग्गजाची या खेळाडूला पसंती
– भारताविरुद्ध या खेळाडूला उतरवा सलामीला; ऍलन बॉर्डर यांनी सुचवला तोडगा