आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत २९६ कसोटी खेळणाऱ्या व २३१ एकदिवसीय क्रिकेट खेळणारा क्रिकेटपटूंनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. सचिन तेंडुलकरने २०० कसोटी सामने खेळण्याचा विश्वविक्रम देखील आपल्या नावे केला. भारतासाठी शंभर कसोटी आणि आणि तितकेच एक दिवसीय सामने खेळणारे बरेच खेळाडू होऊन गेले. या सर्व खेळाडूंना भारतीय क्रिकेटमध्ये एक मानाचे व आदराचे स्थान आहे. मात्र, या सर्वांमध्ये असेही काही खेळाडू होऊन गेले, जे भारतासाठी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आंतरराष्ट्रीय सामने खेळले. मोजदाद करायची म्हटली तर, असे नावाला भारतीय संघाकडून खेळलेले ६०-७० क्रिकेटपटू नक्की सापडतील. या यादीतील एक ठळक नाव म्हणजे सरनदीप सिंह.
क्रिकेटची सुरुवात
एका पंजाबी कुटुंबात जन्म झालेले सरनदीप हे आवड म्हणून क्रिकेट खेळायला लागले. एक उत्तम फलंदाज आणि ऑफ स्पिन गोलंदाजी अशा अष्टपैलू कौशल्यामुळे ते पंजाबमधील क्रिकेट वर्तुळात अगदी लहान वयातच प्रसिद्ध झाले. सन १९९८-१९९९ च्या हंगामात पंजाबकडून खेळताना, त्यांनी अठराव्या वर्षीच प्रथमश्रेणी पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यात त्यांनी ४५ धावांची खेळी केली. पण, बळींचा रकाना रिकामाच राहिला. सुपर लीगमधील शानदार कामगिरीच्या जोरावर त्यांची भारताच्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट क्रिकेट संघात निवड झाली. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ८ बळी घेण्याचा पराक्रम त्यांनी नोंदवला होता.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत मिळाला प्रवेश
सरनदीप यांनी सन १९९९-२००० चा रणजी हंगाम चांगलाच गाजवला. अवघ्या १९.४३ च्या सरासरीने त्यांनी ३७ बळी मिळवण्याची कामगिरी केली होती. याच कामगिरीचे बक्षीस म्हणून त्यांना, नव्याने सुरू झालेल्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत प्रवेश मिळाला. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या पहिल्या बॅचमध्ये २४ खेळाडूंचा समावेश होता. यातील, १३ खेळाडूंनी पुढे जाऊन भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यापैकी, मोहम्मद कैफ, गौतम गंभीर, युवराज सिंह, मुरली कार्तिक, झहीर खान, हरभजन सिंह यांनी बरीच वर्ष भारतीय क्रिकेटची सेवा केली. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सरनदीप यांना इरापल्ली प्रसन्ना, श्रीनिवासन वेंकटराघवन व रॉजर बिन्नी या दिग्गजांचे मार्गदर्शन लाभले. सन २००० च्या एनकेपी साळवे चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेत, भारत अ संघाकडून खेळताना, सरनदीप यांनी भारताच्या राष्ट्रीय संघाचे तीन खंदे फलंदाज बाद केले
आंतरराष्ट्रीय पदार्पण
आपल्या फिरकीच्या जोरावर देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या सरनदीप यांना लवकरच भारतीय संघात संधी देण्यात आली. नोव्हेंबर २००० मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध नागपूर कसोटीद्वारे त्यांनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. सुरुवातीला झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी वर्चस्व गाजवल्यानंतर, सरनदीप यांनी चेंडू हातात घेतला. फिरकीला मदतगार झालेल्या खेळपट्टीवर, सरनदीप यांनी चांगलाच चेंडू वळवत झिम्बाब्वेचे सहा गडी बाद केले.
‘फलंदाज’ सरनदीप सिंह
जॉर्जटाउन येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात सरनदीप यांनी आपले फलंदाजी कौशल्य दाखवले. त्यांनी राहुल द्रविडसोबत आत्मविश्वासाने फलंदाजी केली. आपल्या ३९ धावांच्या नाबाद खेळीसाठी त्यांनी १२० चेंडूंचा सामना केला. भारताचा डाव ७ बाद २७५ अशा स्थितीत असताना, ते मैदानावर उतरले होते. त्यांनी संयमी खेळी केली आणि खात्री करुन दिली की, भारत आणखी एक बळी गमावणार नाही. त्यांनी द्रविडसोबत १२० धावांची भागीदारी केली. हा सामना अनिर्णीत संपला. परंतु ,फलंदाजीच्या क्षमतेबद्दल सरनदीप यांचे कौतुक झाले.
आंतरराष्ट्रीय कारकीर्द
सन २००१ च्या रणजी हंगामदेखील त्यांची कामगिरी चांगली राहिली. त्यामुळे, त्यांना पुन्हा इंग्लंडविरुद्धच्या बेंगलोर कसोटीसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले. मात्र, अंतिम अकरामध्ये जागा बनविण्यात ते अपयशी ठरले. त्यानंतर, कधीच ते भारतीय संघात पुनरागमन खेळताना दिसले नाहीत. हरभजन सिंहने आपल्या अचंबित करणाऱ्या प्रदर्शनामुळे, भारतीय संघातील फिरकीपटूची जागा कमावली. याचमुळे, सरनदीप हे या स्पर्धेत मागे पडले.
बरीच वर्षा, दिल्लीसाठी प्रथमश्रेणी क्रिकेट खेळल्यानंतर, सन २००७ च्या रणजी हंगामात हिमाचल प्रदेशसाठी खेळण्याचा निर्णय घेतला. २०१२ मध्ये क्रिकेटमधून निवृत्त होईपर्यंत, ते हिमाचलसाठी क्रिकेट खेळत राहिले. याच दरम्यान त्यांनी, आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेविल्सचे प्रतिनिधित्व केले. सरनदीप यांनी भारतासाठी फक्त ३ कसोटी व ५ एकदिवसीय सामने खेळले.
निवडसमिती सदस्य सरनदीप सिंह
क्रिकेटमधून बाजूला झाल्यानंतर त्यांनी क्रिकेट समीक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली. सन २०१६ मध्ये एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीत, सरनदीप उत्तर विभागाचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले. लोढा समितीच्या शिफारशीनुसार ते आजही निवड समितीचे सदस्य आहेत.