ठाणे। महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि ठाणे जिल्हा कबड्डी असो.च्या मान्यतेने आमदार गणपतशेठ गायकवाड व नवतरुण क्रीडा मंडळाने स्व. अनिल महादेव कर्पे स्मृती प्रित्यर्थ आयोजित केलेल्या “श्री देवेंद्र फडणवीस चषक” राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या महिलात राजमाता जिजाऊ, राफा नाईक, शिवशक्ती महिला, शिवतेज मंडळ, महेशदादा लांडगे स्पोर्ट्स, महात्मा फुले, महात्मा गांधी, अमरहिंद मंडळ, डॉ.शिरोडकर, स्वराज्य स्पोर्ट्स, तर पुरुषांत शिवशंकर मंडळ, जॉली स्पोर्ट्स, स्वस्तिक मंडळ, हनुमान सेवा, बाबुराव चांदेरे स्पोर्ट्स, स्व. आकाश मंडळ, ओम कबड्डी संघ, केदारनाथ मंडळ, बंड्या मारुती सेवा, सत्यम, छावा सडोली, जय शिव मंडळ यांनी बाद फेरीत प्रवेश केला.
पुरुषांच्या क आणि इ गटात तिन्ही संघाचे प्रत्येकी २-२ समान साखळी गुण झाले. क गटात गुण सरसरीत स्वस्तिक मंडळाचे अधिक १९ गुण, हनुमान सेवा उणे ०८ गुण, गोलफादेवी सेवा उणे ११ असे गुण झाले. या गटातून स्वस्तिक आणि हनुमान असे दोन संघ बाद फेरीत दाखल झाले. तर इ गटात गुण सरसरीत सत्यम सेवा अधिक १४, बंड्या मारुती अधिक ०५, हुतात्मा शांताराम उणे १९ असे गुण झाले. या गटातून सत्यम सेवा, बंड्या मारुती हे दोन संघ बाद फेरीत दाखल झाले.
कोळशेवाडी-कल्याण(पूर्व) येथील स्व. दादासाहेब गायकवाड क्रीडांगणावर सुरू झालेल्या महिलांच्या ड गटात अमरहिंद मंडळाने ज्ञानशक्ती मंडळाचा २७-२२ असा पराभव करीत बाद फेरीतील आपले स्थान पक्के केले. मध्यांतरापर्यंत चुरशीने खेळल्या या सामन्यात दोन्ही संघ १३-१३ अशा समान गुणांवर होते. मध्यांतरानंतर अमरहिंदच्या तेजस्वीनी पोटे, दिव्या रेडकर, दिव्या रेडकर यांनी आपला खेळ गतिमान करीत हा विजय साकारला. ज्ञानशक्तीच्या लक्ष्मी व मानसी गायकर या भगिनींचा खेळ उत्तरार्धात कमी पडला.
याच गटात महात्मा गांधी स्पोर्ट्सने अमरहिंदला ४७-१० असे सहज नमवित गटात अग्रस्थान पटकाविले. सायली जाधव, तृप्ती सोनावणे यांच्या झंजावाती चढाया, तर करीना कामतेकर, तेजस्वी पाटेकर यांचा भक्कम बचाव यामुळे हा मोठा विजय शक्य झाला. अमरहिंदच्या सानिका वाडेकर, दिव्या रेडकर यांची मात्रा या सामन्यात चालली नाही.
शिवशक्ती महिला संघाने ब गटात शिवतेज मंडळाचा ४८-१५ असा फडशा पाडत या गटात प्रथम क्रमांक पटकावला. पूजा यादव, ऋणाली भुवड, मानसी पाटील, पौर्णिमा जेधे या विजयाचे शिल्पकार ठरल्या. शिवतेजच्या माधुरी गवंडी, सदल शेख बऱ्या खेळल्या. तर स्वराज्य स्पोर्टसने डॉ शिरोडकर स्पोर्ट्स वर ३७-२० अशी सहज मात दिली. स्वराज्य कडून स्मिता पांचाळ, काजल खैरे, यशिका पुजारी यांनी चतुरस्त्र खेळ केला.
अ गटात राजमाता जिजाऊने कर्नाळा स्पोर्टसला ४९-२१ असे नमवित गटविजेतेपद पटकाविले. सलोनी गजमल, मानसी सावंत यांच्या चतुरस्त्र खेळाने राजमाताने हा विजय साकारला. कर्नाळा स्पोर्ट्सकडून रश्मी पाटील, रचना म्हात्रे, निमिषा म्हात्रे यांना या सामन्यात सूर सापडला नाही.
पुरुषांच्या ब गटात गोलफादेवी सेवा मंडळाने जय हनुमान मंडळावर ३३-२४ अशी मात केली. सिद्धेश पिंगळे, धनंजय सरोज, विष्णू हरमळे या विजयाचे शिल्पकार ठरले. याच गटात हुतात्मा शांतारामने गोलफादेवीला १९-११ असे नमविल्यामुळे या गटात समान साखळी गुण झाले. गुण सरसरीत गोलफादेवी संघ साखळीतच गारद झाला. इ गटात निलेश लाड, विनोद अत्याळकर यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर बंड्या मारुतीने सत्यम मंडळाला २८-१७ असे नमविलें. सत्यमचे लवलेश महाडिक, दीपेश राणावे चमकले. या गटात देखील समान साखळी गुण झाले. बंड्या मारुती, सत्यम सेवा या गटातून बाद फेरीत दाखल झाले.
क गटात स्व. आकाश मंडळाने बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशनचा १९-१४ असा पाडाव करीत बाद फेरी गाठली. जितेश, विशाल, कल्पेश या पाटील बंधूंच्या खेळाने ही विजयाची किमया साधली. बाबुराव चांदेरे स्पोर्ट्सने या नंतर झालेल्या सामन्यात रेल्वे बॉईजला ४०-२० असे पराभूत करीत बाद फेरीतील आपले स्थान निश्र्चित केले. सुनील दुबिले, मनोज बेंद्रे, अक्षय जाधव यांच्या सर्वांगसुंदर खेळाला या विजयाचे श्रेय जाते.
ब गटात ओम कबड्डी संघाने सांगलीच्या तरुण भारत मंडळाला २९-२१ असे पराभूत करीत बाद फेरीतील आपली जागा पक्की केली. पहिल्या सामन्यात पराभूत झालेल्या ओमला या सामन्यात विजय मिळविणे गरजेचे होते. अक्षय भोपी, सुरज मिश्रा, राहुल भोसले यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. आज उप-उपांत्यपूर्व आणि उप-उपांत्य फेरीचे सामने होतील. आज या स्पर्धेला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देणार आहेत.