भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाने दिलेली आव्हाने पार करू शकला नाही. त्यामुळे, भारतीय चाहत्यांना भारताचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्माची आठवण येत आहे. चाहत्यांनी म्हटले आहे की, रोहित असता तर भारतीय संघ ही आव्हाने पेलू शकला असता. रोहित शर्माला संघात न निवडण्यासाठी अनेक जण कर्णधार विराट कोहलीला जबाबदार धरत आहेत. मात्र, माजी भारतीय खेळाडू मदनलाल यांनी विराटची पाठराखण केली आहे.
खेळाडू आणि संघ व्यवस्थापन यांच्यात सुसंवादाचा अभाव
भारताच्या १९८३ विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य असलेले मदनलाल म्हणाले, “खेळाडू आणि संघ व्यवस्थापन यांच्यात जो संवाद असायला पाहिजे, तो या संघात दिसत नाही. रोहित शर्मा तंदुरुस्त नव्हता, तर तो आयपीएलमध्ये का खेळला? विराट म्हणाला होता, रोहित संघासोबत का आला नाही हे मला माहीत नाही. रोहितच्या दुखापतीबद्दल काहीही स्पष्ट नाही. संघाला उगीच वाट पाहावी लागत आहे. विराटचे वक्तव्य हे संघात सुसंवाद असल्याचे सूचक आहे. ज्याप्रकारे वृद्धिमान साहा ऑस्ट्रेलियामध्ये येऊन दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करतोय, त्याच प्रकारची गोष्ट रोहित व ईशांत यांच्या बाबतीत घडली असती.”
विराटच्या वक्तव्याचे केले समर्थन
सध्या भारताच्या क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य असलेल्या मदनलाल यांनी भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या वक्तव्याचे समर्थन करताना म्हटले, “विराटने जी गोष्ट म्हटली त्यात तथ्य आहे. कर्णधाराला सर्व गोष्टी स्पष्ट माहीत असाव्या. कारण, त्याला संघाचे संचालन करायचे असते. खेळाडूंनी आणि बोर्डाने कर्णधार व प्रशिक्षकांना सर्व गोष्टी सांगायला हव्या. रोहित ७०% तंदुरुस्त होता, तर तो आयपीएलमध्ये का खेळला?”
एनसीएमध्ये घाम गाळत आहे रोहित
सध्या रोहित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. रोहितला आयपीएल २०२० दरम्यान हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यानंतर तो तीन सामन्यांना मुकला होता. पुढे, त्याने अंतिम सामन्यासह तीन सामने खेळले होते. अंतिम सामन्यात अर्धशतकी खेळी करून, त्याने मुंबई इंडियन्सला आयपीएलचे पाचवे विजेतेपद मिळवून दिले.
रोहितच्या पहिल्या दोन कसोटीत खेळण्यावर प्रश्नचिन्ह
आयपीएल दरम्यानच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या कोणत्याच संघात रोहितची निवड झाली नव्हती. या निवडीवरून वाद झाल्यानंतर, त्याला कसोटी संघात समाविष्ट करण्यात आले. दुखापतीमुळे तो अजूनही ऑस्ट्रेलियाला गेलेला नाही. आता रोहित ऑस्ट्रेलियाला पोहोचला, तर त्याला दोन आठवडे क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल. या नियमामुळे त्याच्या, पहिल्या दोन कसोटी सामन्यात सहभागी होण्यावर प्रश्नचिन्ह आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘विराट फलंदाजीला आल्यावर मला झोपेतून उठवा’, आपल्या मुलाबद्दल इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे वक्तव्य
शाहरुख खानने विकत घेतला आणखी एक टी२० संघ, ‘या’ लीगमध्ये घेणार भाग
ट्रेंडिंग लेख-
लाजवाब! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिकेत खोर्याने धावा काढणारे ३ भारतीय खेळाडू
नादच खुळा! ऑस्ट्रेलिया दौर्यात एकाच टी२० मालिकेत सर्वात जास्त विकेट्स घेणारे ३ भारतीय शिलेदार
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ