भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने 2018 साली वेस्ट इंडिज विरुद्ध आपले कसोटी पदार्पण केले होते. पदार्पणाच्या सामन्यात केवळ 10 चेंडू टाकल्यानंतर शार्दुल दुखापतग्रस्त झाला होता. यानंतर शार्दुलने दोन वर्ष प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करत पुन्हा भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवले. अखेर जेव्हा ब्रिस्बेन येथे कारकिर्दीतील दुसरा सामना खेळण्याची संधी मिळाली, तेव्हा आपल्या गोलंदाजीच्या पहिल्याच चेंडूवर शार्दुलने हॅरीसला बाद केले. शार्दुलच्या मते हे सर्व स्वप्नवतच आहे.
शार्दुलने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर रविचंद्रन अश्विनला दिलेल्या एका छोट्याशा मुलाखतीत या सर्व प्रसंगाचा उलगडा केला आहे. शार्दुल म्हणाला, “कसोटी सामना खेळण्यासाठी दोन वर्षांनी संधी मिळणे व त्यानंतर पहिल्याच चेंडूवर विकेट घेणे, हे एखादे स्वप्न साकार होण्यासारखे आहे. संघासाठी योगदान दिल्याने मी आनंदी झालो आहे.”
शार्दुलने गोलंदाजी सोबतच फलंदाजीत देखील कमाल केली आहे. शार्दुल पहिल्या डावात 67 धावा करत भारताच्या डावातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. शार्दुलने यावेळी आपल्या डावाची सुरुवात पॅट कमिंस विरुद्धच्या षटकाराने केली. याबद्दल बोलताना शार्दुल म्हणाला, “मी त्यावेळी षटकार ठोकण्याचा विचार केला नव्हता. मी केवळ चेंडू पाहून प्रतिक्रिया दिली. ”
शार्दुलने स्टार्क विरुद्ध काही जबरदस्त चौकार ठोकले होते. याबद्दल तो म्हणाला, “खरे सांगायचे तर मी कुठलाही सराव केला नाही. मी त्यावेळी उत्तम फलंदाजी करत होतो व त्यामुळेच हे शक्य झाले. मी कोणत्याही खराब चेंडूला वाया जाऊ न देण्याचा निर्णय घेतला होता.”
महत्त्वाच्या बातम्या –
टी-20 विश्वचषकापूर्वी ‘हा’ संघ करणार भारताचा दौरा
ब्रिस्बेन कसोटीत अंपायरचा शार्दुलवर अन्याय? तळातील फलंदाजाला वेगवान बाउंसर टाकल्याने दिली चेतावणी