भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या बहुप्रतीक्षित कसोटी मालिकेला येत्या १७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला सलामीवीरांची चिंता सतावते आहे. त्यांचे नियमित सलामीवीर डेविड वॉर्नर आणि विल पुकोवस्की दुखापतग्रस्त आहेत, तर जो बर्न्स गेले काही महिने खराब फॉर्मातून जात आहे.
अशावेळी ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापन कोणत्या फलंदाजांना सलामीला आजमावून पाहणार, याची चर्चा जोर धरू लागली आहे. याच अनुषंगाने ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज आणि आयसीसीच्या जागतिक कसोटी क्रमवारीत चौथ्या स्थानावर असणारा मार्नस लबूशाने याने आपण कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास तयार असल्याचे वक्तव्य केले आहे.
लबूशाने सलामीला येण्याची शक्यता
नियमित सलामीवीरांच्या अनुपस्थितीत युवा फलंदाज मार्नस लबूशाने सलामीला येण्याची शक्यता वर्तविली जात होती. याबाबत बोलताना लबूशाने म्हणाला, “मी सलामीला येण्याचा कुठलाही निर्णय घेतला गेला नाही. या सगळ्या केवळ अफवा आहेत. मी तिसर्या क्रमांकावर फलंदाजी करत असतो. सध्या तरी मी योग्य पद्धतीने सराव करण्यावर लक्ष केंद्रित करतो आहे. मधल्या फळीत फलंदाजी असो किंवा सलामीला येऊन, सामन्यात पूर्ण तयारीने उतरण्यावर माझा भर असेल.”
भारतीय गोलंदाजांचा सामना करण्याबद्दल विचारले असता तो म्हणाला, आम्ही त्यासाठी तयार आहोत. वनडे सामन्यांतही आम्ही बुमराहला आणि इतर गोलंदाजांना खेळलो आहोत. आम्हाला आमच्या समोरच्या आव्हानाची पुरेपूर जाणीव आहे. फक्त लक्ष केंद्रित करून योग्य प्रकारे तयारी करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे.”
प्रकाशझोतात होणार पहिला सामना
बॉर्डर-गावसकर मालिकेतील पहिला सामना अॅडलेडच्या मैदानावर गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात खेळविण्यात येणार आहे. दिवस-रात्र खेळवल्या जाणार्या या सामन्याची उत्सुकता समस्त क्रिकेट जगताला आहे. टीम पेनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला यापूर्वीच्या मालिकेत भारतीय संघाने २-१ अशी त्यांच्याच देशात धूळ चारली होती. भारतीय संघ यावेळी त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करेल.
संबंधित बातम्या:
– ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत हे ३ गोलंदाज लढवणार भारताची खिंड; स्पिनरचाही समावेश
– कसोटी मालिकेत स्लेजिंग तर होणारच! ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाचे विधान
– ऑस्ट्रेलियाविरुद्ध कशी जिंकायची कसोटी मालिका? भारतीय दिग्गजांनी सांगितला प्लॅन