भारतीय क्रिकेटचा नवीन हंगाम नुकताच सुरू झाला आहे. न्यूझीलंडविरुद्ध मायदेशातील टी२० मालिकेने या हंगामाला सुरुवात झाली. या टी२० मालिकेनंतर उभय संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. या मालिकेतील पहिल्या सामन्यात नियमित कर्णधार विराट कोहली उपस्थित असणार नाही. त्यामुळे कानपूर येथे होणाऱ्या कसोटीत भारताचे नेतृत्व उपकर्णधार अजिंक्य रहाणे करताना दिसेल. रहाणे भारतीय संघाच्या शिबिरात दाखल होण्यापूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) त्याचा सत्कार करत त्याच्याशी संवाद साधला.
एमसीए अध्यक्षांनी केला सत्कार
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळून मुंबईत परतल्यानंतर रहाणे आगामी कसोटी मालिकेसाठी तयारी करत आहे. त्याचवेळी एमसीए पदाधिकाऱ्यांनी रहाणेची सदिच्छा भेट घेतली. वांद्रे कुर्ला संकुलात जगदीश आचरेकर (खजिनदार), नदीम मेमन आणि अजिंक्य नाईक (एमसीए सर्वोच्च समितीचे सदस्य) आणि मुंबईचे मुख्य प्रशिक्षक अमोल मजुमदार यांच्या उपस्थितीत एमसीए अध्यक्ष विजय पाटील यांनी रहाणेला पुष्पगुच्छ देत त्याचा सत्कार केला. तसेच आगामी स्पर्धांविषयी देखील चर्चा करण्यात आली.
कानपूर येथे होणार पहिली कसोटी
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी कानपूर येथे खेळली जाणार आहे. नियमित कर्णधार विराट कोहली याने या कसोटीतून विश्रांतीच्या कारणाने माघार घेतली असून, मुंबई येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत तो संघाचा भाग असेल. रहाणेच्या नेतृत्वात भारताच्या संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभूत करण्याची कामगिरी करून दाखवली होती. मात्र, इंग्लंड दौऱ्यावर तो फलंदाज म्हणून कमालीचा अपयशी ठरला होता. त्यामुळे संघातील त्याच्या जागेवर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.
रहाणेच्या नेतृत्वातील मुंबई संघाची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील कामगिरी निराशाजनक होती. मुंबई संघाला स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश करता आला नव्हता. मुंबई संघ आता पुढील महिन्यात विजय हजारे ट्रॉफीमध्ये सहभागी होईल.