भारतात सध्या रणजी ट्रॉफीचे सामने सुरु आहेत. या स्पर्धेत मुंबई संघाला शुक्रवारी रेल्वे विरुद्ध 10 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला आहे. त्यातच श्रेयस अय्यर, शिवम दुबे हे मुंबईचे खेळाडू या सामन्यात खेळले नसल्याने त्यांच्यावर तसेच मुंबई संघावर काही माजी क्रिकेटपटूंनी टीका केली आहे. यामध्ये विनोद कांबळीचाही समावेश आहे.
अय्यर आणि दुबे यांनी वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेनंतर रेल्वेविरुद्ध रणजी सामना न खेळता विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता हा निर्णय त्यांना महागात पडण्याची शक्यता आहे.
त्यांच्यावर माजी क्रिकेटपटूंबरोबरच मुंबई क्रिकेट असोसिएशनही(एमसीए) नाराज असल्याची चर्चा आहे.
तथापि ते 3 जानेवारीपासून कर्नाटकविरुद्ध सुरु होणाऱ्या मुंबईच्या पुढच्या सामन्यासाठी अनुपलब्ध असणार आहेत. कारण 5 जानेवारीपासून भारतीय संघाची श्रीलंकेविरुद्ध टी20 मालिका सुरु होणार असून अय्यर आणि दुबे हे दोघेही भारतीय टी20 संघाचा भाग आहेत.
पण असे असले तरीही जोपर्यंत हे दोघेही रेल्वेविरुद्धच्या सामन्यात न खेळण्याचे कारण स्पष करत नाही तोपर्यंत मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवड समिती त्यांची मुंबई संघात निवड न करण्याचीही शक्यता आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार एमसीएचे एक अधिकारी म्हणाले, ‘मुंबई क्रिकेटसाठी हा दुर्दैवी भाग आहे. त्यांनी आम्हाला सांगितले की त्यांना बीसीसीआयने विश्रांतीचा सल्ला दिला होता. तथापि, जेव्हा आम्ही निवडकर्त्यांकडे तपासणी केली तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की निवड समितीकडून अशाप्रकारची कोणतीही सूचना पाठविली गेली नव्हती.
‘मग त्यांना विश्रांती घेण्यास कोणी सांगितले? भारतीय संघाचा फिजिओ की ट्रेनरने? किंवा त्यांनी बोर्डाच्या खांद्यावर बंदूक ठेवत स्वत:च विश्रांती घेतली? हे कौतुक करण्यासारखे नाही. असोसिएशनच्या पुढील अॅपेक्स कौन्सिलच्या बैठकीत या विषयावर नक्कीच चर्चा होईल. आम्ही कदाचित लवकरच काही कारवाई करू.’
तसेच आणखी एका एमसीएच्या अधिकाऱ्याने एकनाथ सोलकर, सुधाकर अधिकारी या माजी क्रिकेटपटूंचे उदाहरण दिले. ते म्हणाले, ‘एकनाथ सोलकर त्याच्या वडिलांच्या निधनानंतर स्मशानभूमीतून ब्रेबॉर्न स्टेडियमवर गेले आणि मुंबईला रणजीचा अंतिम सामना जिंकून दिला.’
‘सुधाकर अधिकारी यांचे सकाळी 9.03 वाजता लग्न झाले आणि त्यानंतर ते ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये दाखल झाले, शतक ठोकले आणि संध्याकाळी पुन्हा रिसेप्शन हॉलमध्ये आपल्या सहकाऱ्यांसह आनंद साजरे करण्यासाठी परत गेले. आजच्या तरुणांकडे मुंबईबद्दल पहिल्यासारखी बांधिलकी राहिली नाही.’
मुंबई विरुद्ध रेल्वेचा सामना 25 डिसेंबरपासून सुरु झाला होता. तसेच वेस्ट इंडिज विरुद्धची वनडे मालिका 22 डिसेंबरला संपली होती. त्याचबरोबर भारताची श्रीलंकेविरुद्धची टी20 मालिका 5 जानेवारीपासून सुरु होणार असल्याने मधल्या काळात अय्यर आणि दुबेने मुंबईकडून सामना न खेळल्याने त्यांच्यावर ही टीका होत आहे.
विशेष म्हणजे अय्यर आणि दुबेचा संघसहकारी शार्दुल ठाकूर वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिकेत खेळल्यानंतरही मुंबईकडून रेल्वेविरुद्ध खेळला. त्याचाही श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात समावेश आहे.
न्यूझीलंडला मोठा धक्का; ट्रेंट बोल्ट कसोटी मालिकेतून बाहेर, जाणून घ्या कारण
वाचा????https://t.co/sStsvA4SCR????#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) December 28, 2019
क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा जेम्स अँडरसन पहिलाच वेगवान गोलंदाज
वाचा????https://t.co/x8lErFNpzt????#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi— Maha Sports (@Maha_Sports) December 28, 2019