नवी दिल्ली । भारतीय संघाचा माजी फलंदाज मोहम्मद कैफ आपल्या स्पष्ट मतांसाठी ओळखला जातो. त्याने गुरुवारी (२१ मे) एमएस धोनी आणि केएल राहुलबद्दल मोठे विधान केले आहे. कैफने स्पष्टपणे म्हटले की, धोनीला तुम्ही घाई करून संघापासून वेगळे करू नका, कारण तो आजही भारताचा सर्वात्तम यष्टीरक्षक आहे. तसेच यावेळी कैफने राहुलला कामचलाऊ (बदली यष्टीरक्षक) यष्टीरक्षक म्हटले आहे
कैफचे मोठे विधान-
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या खास मुलाखतीत कैफने (Mohammad Kaif) धोनीबद्दल आपले मत स्पष्ट केले. तो म्हणाला की, “लोक विचार करत आहेत की धोनी खूप काळापासून संघातून बाहेर आहे आणि आयपीएलमध्ये खेळून तो सहजपणे संघात खेळेल. परंतु मला असे वाटत नाही. धोनी (MS Dhoni) महान खेळाडू आहे. तो एक मॅच विनर (सामना विजेता) आहे. धोनीला माहिती आहे की, दबावात सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजी कशाप्रकारे केली जाते. माझ्या मते धोनी अव्वल क्रमांकाचा खेळाडू आहे.”
“किती खेळाडू आले त्याने काहीच फरक पडत नाही. यातील कोणीही धोनीची जागा घेऊ शकत नाही. मला वाटते की, जेव्हा तुम्ही संघातून कोणाला वगळता, तेव्हा तुम्हाला त्याचा पर्यायदेखील मिळणे गरजेचे असते. इतकेच नव्हे तर धोनीने विश्वचषकात उपांत्यपूर्व सामन्यात जडेजाबरोबर चांगली भागीदारी केली होती. त्याने जवळपास भारताला विजय मिळवून दिला होता,” असेही तो यावेळी म्हणाला.
कैफने राहुलच्या यष्टीरक्षणावरही मोठे वक्तव्य केले. तो म्हणाला की, “मला नाही वाटत की, राहुल दीर्घ काळापर्यंत योग्य पर्याय आहे. तो बदली यष्टीरक्षक म्हणून खेळू शकतो. रिषभ पंत (Rishabh Pant) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) या खेळाडूंनादेखील धोनीचा पर्याय बनता आले नाही. जेव्हा तुम्ही सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा पर्यायाबद्दल विचार केला तर विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma), अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा या खेळाडूंची नावे समोर येतात.
या खेळाडूंनी पर्याय म्हणून त्यांची जागा भरली आहे. परंतु धोनीबद्दल असे काही नाही. धोनी आज अव्वल क्रमांकाचा यष्टीरक्षक आहे तसेच तो खूप फीटदेखील आहे.
धोनी मागील वर्षी २०१९च्या विश्वचषकातील उपांत्यफेरीच्या सामन्यानंतर एकदाही भारताकडून खेळलेला नाही. मागील वर्षीपासून भारतीय संघात यष्टीरक्षकाची जागा पंतला दिली होती परंतु शेवटी ही जबाबदारी राहुलला देण्यात आली.
ट्रेंडिंग घडामोडी-
-क्रिकेटच्या इतिहासात भारताच्या नावावर लागलेला ‘हा’ कलंक कधीच नाही पुसला जाणार
-पाकिस्तान संघाला वनडेत धु- धु धुणारे ३ भारतीय क्रिकेटर्स
-एक नाही, दोन नाही; तब्बल ५१ वर्ष आहे अबाधित या भारतीयाचा कसोटी विक्रम