याहू सर्च इंजिनने २०२१ वर्षात सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्यांची यादी घोषित केली आहे. क्रीडाविश्वाच्या दृष्टीने या संपूर्ण वर्षात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. यावर्षी पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने सुवर्ण पदक जिंकले. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने इंग्लंड दौऱ्यावर चांगले प्रदर्शन केले. तर, एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्सला अजून एक आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिली. त्याव्यतिरिक्त अनेक मोठ्या गोष्टी देखील क्रीडाविश्वात घडल्या. चला तर एक नजर टाकूया यावर्षी सर्वाधिक सर्च केल्या गेलल्या खेळाडूंवर.
क्रीडाविश्वातील सर्वाधिक शोधल्या गेलेल्या खेळाडूंच्या विचार केला, तर पहिल्या स्थानावर विराट कोहली आहे. यावर्षी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत विराटच्या नेतृत्वात भारताने अंतिम सामना खेळला आणि पराभव पत्करला. मात्र, त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर भारताने उत्कृष्ट प्रदर्शन केले. तसेच विराटने यादरम्यान भारताच्या टी२० संघाचे नेतृत्व सोडले, त्याने हा निर्णय कामाच्या व्यापामुळे घेतल्याचे सांगितले. त्याव्यतिरिक्त विराटने आयपीएल फ्रेंचाजझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे नेतृत्व सोडण्याची घोषणा केली. यावर्षी पार पडलेल्या टी२० विश्वचषकात विराटच्या नेतृत्वात भारतीय संघाने खूपच निराशाजन प्रदर्शन केले. एकंदरीतच विराट या संपूर्ण वर्षात सतत चर्चेत राहिला.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीचे नाव आहे. एमएस धोनीने यावर्षी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्स संघाला आयपीएलचे जेतेपद जिंकवून दिले. तसेच त्याने टी२० विश्वचषकादरम्यान भारतीय संघाच्या मेंटरची भूमिका पार पाडली. नीरज चोप्राने यावर्षी पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपद जिंकले आणि यासाठी त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. नीरजने भालाफेक स्पर्धेत हे सुवर्ण पदक जिंकले आहे. नीरज यावर्षी सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. नीरजला त्याच्या कामगिरीसाठी राष्ट्रपतींच्या हस्त पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सचिन तेंडुलकर या यादीत नीरज चोप्राच्या मागे राहिला. सचिन चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक सर्च केला गेलेला भारतीय खेळाडू ठरला आहे. नीरजने सचिनला मागे टाकत पहिल्या तीनमध्ये स्थान बनवले. रोहित शर्मा या यादीत पाचव्या स्थानावर आहे. विराट कोहलीने भारताच्या टी२० संघाचे नेतृत्व सोडल्यानंतर ही जबाबदारी रोहितने स्वीकारली. रोहितच्या नेतृत्वात भारताने न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिकेत ३-० असा मोठा विजय मिळवला. तत्पूर्वी, रोहितच्या नेतृत्वातील आयपीएल फ्रेंचायझी मुंबई इंडियन्सने यावर्षी निराशाजनक प्रदर्शन केले. मुंबई इंडियन्स संघ यावर्षी आयपीएलच्या प्लेऑफ फेरीत पोहोचू शकला नाही.