टी२० विश्वचषकातील भारतीय संघाचा प्रवास संपला, त्यासोबतच विराट कोहली आणि रवी शास्त्री यांची कर्णधार-प्रशिक्षक जोडीदेखील विभक्त झाली. टी२० विश्वचषकानंतर शास्त्रींचा मुख्य प्रशिक्षकाच्या रूपातील कार्यकाळ संपला आहे. शास्त्रींच्या प्रशिक्षणात भारतीय संघाला एकाही आयसीसी स्पर्धेचे जेतेपद जिंकता आले नसले तरी, त्यांच्यासोबत संघाने अनेक विदेशी दौरांमध्ये यश मिळवले आहे. टी२० विश्वचषकातील नामिबियाविरुद्धचा सामना शास्त्रींचा प्रशिक्षकाच्या रूपातील शेवटचा सामना ठरला. या सामन्यानंतर एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याकडून शास्त्रींना खास भेट मिळाली आहे.
संघासोबतचा प्रवास संपल्यानंतर रवी शास्त्रींविषयी खेळाडूंच्या मनात असलेला आदर पाहायला मिळाला. भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा भारतीय संघाचा मेंटर एमएस धोनीने शास्त्रींना त्याचा कार्यकाळ संपल्यानंतर त्याचा शर्ट भेट दिला आहे, तर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी शास्त्रींना त्यांची बॅट भेट दिली आहे. शास्त्रींनी स्वत: याविषयी एका मुलाखतीत बोलताना माहिती दिली आहे.
शास्त्रींच्या प्रशिक्षणात भारतीय संघाने ४३ कसोटी सामने खेळले ज्यापैकी २५ मध्ये विजय मिळवला आहे. तसेच ७६ वनडे सामन्यांपैकी ५१ मध्ये विजय मिळवला. त्यांच्या कार्यकाळात भारतीय संघाने टी२० क्रिकेटमध्ये अधिकच चांगले प्रदर्शन केले आहे. टी२० मध्ये भारताने त्यांच्या मार्गदर्शनात ६४ सामन्यांपैकी ४२ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. अशा प्रकारे भारताने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये शास्त्रींच्या कार्यकाळात १८३ सामने खेळले आणि त्यापैकी ११८ मध्ये विजय मिळवला. तर ५३ सामन्यामध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
आयपीएलला जास्त महत्वा दिले जाते की देशाला असा प्रश्न विचारण्यात आल्यावर शास्त्रींनी उत्तर दिले की, “याविषयी कसलाच प्रश्न नाही, जर असे नसते तर मागच्या पाच वर्षात अशाप्रकारचे प्रदर्शन तुम्हाला पाहायला मिळाले नसते. तो खेळाडू मुर्ख असेल जो देशासाठी खेळण्याऐवजी फ्रेंचायझीला महत्व देईल. ते भारतासाठी खेळत आहेत, तुमच्या छातीवर बिल्ला असतो, तुम्हाला जगभरातील करोडो लोक पाहत असतात. तुम्ही खूप नशिबवान आहात, जे एवढ्या लोकसंख्येच्या देशात त्या अकरा खेळाडूंमध्ये सामील आहात,ज्यांना देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळतेय. या सर्व खूप दुरच्या गोष्टी आहेत आणि जे असे म्हणत आहेत त्यांच्यासाठी माझ्याकडे वेळ नाही.”