मुंबई । सौरभ पार्टे आणि सुमेध सावंतच्या धीरोदात्त खेळाच्या जोरावर मुंबई उपनगरने स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत दोन धडाकेबाज विजयांची नोंद करीत बाद फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. तसेच राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील आघाडीचे 12 संघ स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे मिनी राज्य अजिंक्यपद स्पर्धा म्हणून लोकप्रिय झालेल्या या स्पर्धेत यजमान मुंबई शहर, ठाणे, सांगली आणि रायगड यांनीही विजयी सलामी दिली. ड गटातून उपनगर बाद फेरीत पोहोचला असला तरी साखळीतील दोन्ही सामने गमावून नाशिक पहिल्याच दिवशी स्पर्धेबाहेर फेकला गेला. एका विजयासह सांगलीनेही बाद फेरी गाठली.
प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीत उभारलेल्या जनार्दन राणे क्रीडानगरीत पुन्हा एकदा कबड्डी कबड्डीचा दम घुमला. माजी लोकसभा अध्यक्ष आणि राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी, राज्याचे माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंदन, मंडळाचे अध्यक्ष रामदास गावकर, प्रमुख कार्यवाह महेश सावंत, क्रीडाप्रमुख चंद्रशेखर राणे यांच्या उपस्थितीत मिनी राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन सूर्यप्रकाशाच्या उजेडात पार पडले. कबड्डीच्या उद्घाटन सोहळ्यांना कधीही वेळेचे भान नसते, मात्र स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने आपला वक्तशीरपणा येथेही दाखवून दिला आणि स्पर्धा वेळेवर सुरू झाली.
स्पर्धेचा उद्घाटनीय सामना अत्यंत चुरशीचा झाला. दादासो आवाडच्या कल्पक चढायांनी नंदूरबारला ठाण्याविरूद्ध मध्यंतराला आघाडी मिळवून दिली होती. हा सामना चांगलाच रंगला होता. कधी आघाडी ठाणे तर कधी नंदूरबारकडे असायची . अशा दोलायमान स्थितीत असलेल्या सामन्यात आघाडी शेवटच्या मिनीटापर्यंत एकमेकांकडे फिरत होती. पण निर्णायक क्षणी सुरज दुंदलेच्या चढाईने ठाण्याला आघाडी मिळवून दिली आणि तीच ठाण्याला विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरली.
मध्यंतराला 13-12 अशी एका गुणांनी आघाडीवर असलेला नंदूरबार शेवटच्या मिनीटाला 26-27 असा एका गुणाने हरला.
आजचा दिवस गाजवला तो मुंबई उपनगरच्या सौरभ पार्टे आणि सुमेध सावंत या चढाईबहाद्दरांनी. त्यांनी नाशिकचा 47-25 असा धुव्वा उडविला आणि त्यानंतर दुसऱ्या सामन्यात 8-9 अशा पिछाडीनंतरही सांगलीवर 29-21 अशी मात केली. या दोन विजयांमुळे उपनगरचा संघ सर्वप्रथम बाद फेरीत पोहोचला असून बाद फेरी म्हणजेच उपउपांत्य सामन्यात त्यांची गाठ राज्य कबड्डी विजेत्या रत्नागिरी किंवा ठाण्याशी पडू शकते.
मुंबई शहरने अहमदनगरची धुळधाण उडवताना 4 लोण चढवत 53-35 असा दिमाखदार विजय संपादला. कर्णधार अजिंक्य कापरे, सुशांत साईल आणि मयूर शिवतरकर यांनी जोरदार खेळ करीत मुंबईला मोठा विजय मिळवून दिला. एवढेच नव्हे त मुंबईने मध्यंतरलाच 3 लोण चढवत 34- 12 अशी प्रचंड आघाडी घेतली. या आघाडीला अहमदनगरने मध्यंतरानंतर चांगले आव्हान दिले, पण त्यांनी मध्यंतरानंतर थोडीशी झुंज दिली, पण घड्याळात वेळ संपली होती. आजच्या दिवसातील सर्वात चमकदार खेळ केला तो रायगडने. त्यांनी स्मितील पाटील आणि गौरव पाटील यांनी पूर्वाधातच सुसाट खेळ केला. पुण्याच्या पवन करंडे आणि शुभम गायकवाड यांनी केलेल्या केलेल्या चढायांनी शहरकडे 29-13 अशी निर्णायक आघाडी घेतली. शेवटच्या काही मिनिटांत पुण्याने डोके बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण तो तोकडा ठरला. त्यामुळे रायगडने पुण्यावर 40-33 अशी सहज मात केली. सांगलीने नाशिकचा खुर्दा पाडायला फार कष्ट करावे लागले नाही.