मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अपेक्स कौन्सिलचे सदस्य आणि प्रसिद्ध क्युरेटर नदीम मेमन यांनी बीसीसीआयला विनंती केली आहे की सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी मुंबईत घ्यावी. कारण मुंबईत ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी अनेक स्टेडियम आहेत.
मेमन यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना इमेल लिहिला आहे. यात त्यांनी लिहिले आहे की ‘मुंबईला सय्यद मुश्ताक अली स्पर्धा आयोजित करण्याची जबाबदारी देण्यात यावी. आपण मुंबईत मुश्ताक अली टी२० ट्रॉफीचा यावर्षीचा हंगाम खेळवू शकतो.’
मेमन यांनी ही विनंती केली आहे, कारण मुंबईमध्ये सर्व सुविधांयुक्त ६ चांगल्या दर्जाचे स्टेडियम्स आहेत. तसेच तिथे चांगले हॉटेल्सही आहेत.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे तीन मैदाने मुंबईत आहेत. वानखेडे स्टेडियम, कांदिवलीमधील बीकेसी आणि सचिन तेंडुलकर जिमखाना ही मैदाने आहेत. तसेच नवी मुंबईमध्ये डीवाय पाटिल स्टेडियम आहे. तर ठाण्यात दादोजी के. स्टेडियम आहे. याबरोबरच क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे ब्रेबॉर्न स्टेडियमही आहे.
तसेच मेमन यांनी सांगितले आहे की बीसीसीआयच्या मार्गदर्शनतत्त्वांनुसार सर्व क्रिकेटपटूंची आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाईल. तसेच मुंबईने फेब्रुवारी-मार्चमध्ये महिलांची वनडे स्पर्धा २० दिवसात आयोजित केली होती.
तसेच त्यांनी म्हटले आहे की भविष्यातील क्रिकेटपटूंसाठी आपल्याला सकारात्मक विचार करावा लागेल आणि स्पर्धा आयोजित करावी लागेल.
त्याचबरोबर मेमन यांनी असेही म्हटले आहे की मुंबईला आल्यानंतर खेळाडूंची कोविड चाचणी करण्यात यावी. तसेच नंतर स्पर्धेच्या ३-४ दिवस आधी देखील खेळाडूंची चाचणी करण्यात यावी.
पण अजूनही भारतात क्रिकेट पुन्हा सुरु करण्याबद्दल बीसीसीआयने कोणतेही भाष्य केलेले नाही. सध्या भारतात कोरोना व्हायरसची प्रकरणे दिवसागणित वाढत आहेत. त्यातही मुंबई हे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव असणारे मुख्य शहरांपैकी एक आहे.