हैद्राबाद। भारत विरुद्ध विंडिज यांच्यात 12 आॅक्टोबरपासून सुरु झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुर दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.
त्याला या सामन्याच्या पहिल्याच सत्रात 10 चेंडू टाकल्यानंतर मांड्यांचे स्नायू दुखावल्याने मैदानाबाहेर जावे लागले होते. हा त्याचा पदार्पणाचा कसोटी सामना होता.
याआधीही शार्दुलला याच दुखापतीमुळे संयुक्त अरब अमिरातीमध्ये पार पडलेल्या एशिया कप स्पर्धेलाही मुकावे लागले होते.
त्याच्या या दुखापतीमुळे मात्र राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या रिहॅबीलीटेशन प्रोग्राम (खेळाडूंना दुखापतीतून सावरण्यासाठी घेण्यात येणारा कार्यक्रम) वर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
या कसोटी सामन्यात शार्दुल सामन्यातील चौथे आणि त्याचे दुसरे षटक टाकत असताना दुखापतग्रस्त झाला आहे.
त्याने या षटकातील चौथा चेंडू टाकल्यानंतर भारतीय संघाचे फिजीओ पॅट्रिक फरहार्ट हे मैदानावर आले आणि शार्दुलला तपासले. पण दुखापतीचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी शार्दुलला ड्रेसिंगरुममध्ये परतण्यास सांगितले.त्यानंतर त्याचे उर्वरित षटक आर अश्विनने पूर्ण केले.
त्यानंतर बीसीसीआयकडून सांगण्यात आले होते की ‘शार्दुलचे स्कॅन करण्यात आले आहे. तो पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षण करणार नाही. स्कॅनच्या रिपोर्ट पाहिल्यानंतर आणि संघ व्यवस्थापनाने तपासल्यानंतर उर्वरीत दुसऱ्या कसोटीतील त्याच्या सहभागावर निर्णय घेतला जाईल.’
याबद्दल बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की ‘मांड्यांचे स्नायूंची दुखापत ही फिटनेसची समस्या असून मैदानावरील नाही. माझा प्रश्न असा आहे की शार्दुलला 10 दिवसांच्या आत फिटनेसचे प्रमाणपत्र कसे मिळाले आणि त्यानंतर 15 दिवसात पुन्हा ती दुखापत उद्भवली. हे आश्चर्यकारक आहे.’
याबरोबरच त्यांनी एनसीएच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले, भारतीय खेळाडूंच्या रिहॅबकडे लक्ष देणारे तुफान घोष आणि आशिष कौशिक यांनी याबद्दलची उत्तरे द्यावीत. कोणत्या प्रकारची फिटनेसची स्पष्टता त्यांनी शार्दुलला दिली आहे.
शार्दुलला पहिल्यांदा 2016 मध्ये विंडिज दौऱ्यात कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. पण त्याला दोन वर्षांनंतर पहिल्यांदा भारताकडून कसोटीत खेळण्याची संधी मिळाली होती.
महत्त्वाच्या बातम्या:
-भारत-चीन फुटबॉल सामना सुटला बरोबरीत
–या वर्षी दक्षिण अफ्रिकेत होणार आयपीएलप्रमाणेच मोठ्या लीगचे आयोजन