लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात आजपासून (7 सप्टेंबर) पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणार आहे. या सामन्यातून भारतीय संघात मुंबईचा 18 वर्षीय पृथ्वी शॉ पदार्पण करु शकतो.
भारतीय संघासमोर सध्या या कसोटी मालिकेत सलामीवीरांच्या अपयशामुळे मोठा प्रश्न उभा आहे. त्यामुळे आता शेवटच्या सामन्यासाठी युवा पृथ्वी शॉला संधी दिली जाऊ शकते. तसेच भारतीय संघ या कसोटी मालिकेत 1-3 असा पिछाडीवर असल्याने भारताकडे गमावण्यासारखे काही उरलेले नाही.
त्याचबरोबर पृथ्वी शॉची मागील काही महिन्यापासून भारतीय अ संघाकडून खेळताना चांगली कामगिरी झाली आहे. तसेच याचवर्षी त्याच्या नेतृत्वाखाली 19 वर्षांखालील भारतीय संघाने विश्वचषक जिंकला आहे.
त्याचबरोबर जून-जुलै महिन्यात भारत अ संघाने केलेल्या इंग्लंड दौऱ्यात शॉने दमदार कामगिरी केली होती. शॉ या दौऱ्यातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. शॉने या दौऱ्यात 8 सामन्यात 3 शतके आणि 2 अर्धशतकांसह 603 धावा केल्या होत्या.
तसेच आॅगस्टमध्ये दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध पार पडलेल्या दोन चार दिवसीय कसोटी सामन्यात त्याने एका शतकासह तीन डावात 157 धावा केल्या आहेत.
त्याची ही कामगिरी पाहता त्याला इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या सामन्यासाठी केएल राहुलच्या एवजी 11 जणांच्या भारतीय संघात स्थान दिले जाऊ शकते.
राहुल या मालिकेत सपशेल अपयशी ठरला आहे. त्याला सातत्याने अपयश येऊनही मालिकेतील पहिल्या चारही संधी देण्यात आली होती. परंतू त्याला या संधीचा उपयोग करता आला नाही. त्याला चार सामन्यातील 8 डावात 14.12च्या सरासरीने 113 धावाच करता आल्या आहेत.
तसेच त्याला एकदाही 40 धावांचा टप्पाही ओलांडता आलेला नाही. त्यामुळे राहुलला पाचव्या सामन्यातून वगळण्याची दाट शक्यता आहे.
शॉची इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या आणि पाचव्या कसोटी सामन्यांसाठी 18 जणांच्या संघात निवड झाली होती. परंतू चौथ्या सामन्यात त्याला 11 जणांच्या संघात संधी मिळाली नव्हती.
देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी-
याबरोबरच शॉने देशांतर्गत क्रिकेटमध्येही 2017-18 मोसमात चांगली कामगिरी केली आहे. त्याने आत्तापर्यंत 14 प्रथम श्रेणी सामन्यात 56.72 च्या सरासरीने 1418 धावा केल्या आहेत. यात त्याने 7 शतके आणि 5 अर्धशतके केली आहेत.
तो वयाच्या 10 वर्षांपासूनच त्याच्या कामगिरीमुळे प्रकाशझोतात आला होता. तसेच त्याने 2016-17 च्या मोसमात 16 व्या वर्षीच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेही रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत तमिळनाडू विरुद्ध. या सामन्यातही त्याने 120 धावा करत त्याची चुनुक दाखवली होती.
त्याचबरोबर त्याने नंतर दुलीप ट्रॉफीमध्येही पदार्पण करताना शतक केले आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. सचिननेही रणजी ट्रॉफी आणि दुलिप ट्रॉफीच्या पदार्पणाच्या सामन्यात शतके केली होती.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–डेव्हिड बेकहमच्या नवीन फुटबॉल संघाची घोषणा
–आशियाई सुवर्णपदक विजेत्या निरज चोप्राच्या त्या कृत्याबद्दल काय म्हणाले भारतीय लष्कर दलप्रमुख?
–विराट कोहलीच्या टीम इंडियाबद्दल केलेले हे वक्तव्य रवी शास्त्रींना भोवले