ट्रांसस्टेडिया ईकेए एरिना अहमदाबाद येथे झालेल्या कबड्डीच्या तिसऱ्या विश्वचषकात आजच्या दिवशी तीन वर्षापूर्वी भारतीय कबड्डी संघाने विजेतपद पटकावले होते. तीन वर्षांपूर्वी २२ ऑक्टोबर २०१६ रोजी भारत विरुद्ध इराण यांच्यात या विश्वचषकातील अंतिम सामना रंगला होता.
या अंतिम सामन्यात भारताने ३८-२९ अश्या फरकाने इराण विरुद्ध विजय मिळवत विश्वचषक जिंकण्याची हट्रिक साधली होती. २०१६ च्या विश्वचषकाआधी भारतीय कबड्डी संघाने २००४ आणि २००७ मध्ये विश्वचषक विजेतेपद मिळवले होते.
२०१६च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात इराणकडून भारतीय संघाला कडवं आव्हान मिळाला होत. परंतु या सामन्यातील उत्तरार्धात अजय ठाकूरने केलेल्या शानदार खेळीने भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. या सामन्यात अजय ठाकूरने सुपर टेन पूर्ण केले होते.
या तिसऱ्या कबड्डी विश्वचषकात १२ देशांनी सहभाग घेतला होता. या विश्वचषकात भारतीय संघ अनुप कुमारच्या नेतृत्वाखाली खेळला होता. या विश्वचषकाची सुरुवात भारतासाठी खराब झाली होती. पहिल्याच सामन्यांत भारताला दक्षिण कोरिया कडून ३४-३२ असा धक्कादायक परभवाला सामोरे जावे लागले होते. परंतु त्यानंतर सर्व सामने जिंकत भारताने विश्वचषक विजयाची हट्रिक साधली.
कबड्डीच्या चौथ्या विश्वचषका संदर्भात अजून कार्यक्रम ठरला नसला तरी पुढीलवर्षी २०२० ला होण्याची शक्यता आहे.