१९९७ चा कॅनडामध्ये झालेला, सहारा फ्रेंडशिप कप आठवतोय का ? तुम्ही खरे क्रिकेटप्रेमी असाल तर कॅनडामध्ये झालेली पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान यांच्या दरम्यानची ही मालिका तुम्हाला आठवायला पाहिजे. दोन्ही देशांदरम्यानची एक उत्कृष्ट मालिका म्हणून या मालिकेकडे पाहिले जाते. दुसरे म्हणजे, ही तीच मालिका ज्यामधील इंजमामचे “आलू” कांड झाले होते. पण, आज आम्ही तुम्हाला या मालिकेतील सौरव गांगुलीच्या त्या अविस्मरणीय स्पेलविषयी सांगणार आहोत ज्यामुळे दादाला एक अष्टपैलू खेळाडू म्हणून मान्यता मिळाली.
भारत-पाकिस्तान मधील राजकीय संबंध कायमच ताणलेले असतात. दोन्ही देश राजकीय कारणांनी एकमेकांचे दौरे करत नसत, म्हणून कॅनडातील टोरंटो येथे ‘सहारा फ्रेंडशिप कप’ चे आयोजन करण्यात आले. कॅनडामध्ये भारतीय व पाकिस्तानी लोकांची संख्या जास्त असल्याने मालिकेला जबरदस्त प्रतिसाद मिळणार याची सर्वांना खात्री होती.
भारतीय संघ सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वात तर पाकिस्तानी संघ रमीझ राजा यांच्या नेतृत्वात कॅनडात दाखल झाला. भारतीय संघात सचिनसमवेत अझर, द्रविड, अजय जडेजा, विनोद कांबळी, सौरव गांगुली, रॉबिन सिंग हे अनुभवी खेळाडू होते. दुसरीकडे पाकिस्तानचे प्रमुख वेगवान गोलंदाज नसले तरी फलंदाज दिग्गज होते. सईद अन्वर, इंजमाम, मोईन खान, शाहिद आफ्रिदी, सलीम मलिक हे रमिझ राजा यांच्या दिमतीला होते. मालिका अटीतटीची होणार अशी सर्वांची अपेक्षा होती.
टोरंटोमध्ये मालिकेला प्रारंभ झाला. देवशिष मोहंती व हरविंदर सिंह यांनी भारतातर्फे एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानला २० धावांनी लोळवत विजयी प्रारंभ केला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात सुद्धा भारतीय संघाने विजय संपादन केला. याच सामन्यात वादग्रस्त “आलू प्रकरण” घडले.
त्याचे झाले असे, भारत फलंदाजी करत असताना सोळाव्या षटकानंतर, एका भारतीय प्रेक्षकाने इंजमामला त्याच्या शरीरावरून हिणवत, “आलू आलू” म्हणायला सुरुवात केली. वैतागलेला इंजमाम त्या प्रेक्षकाच्या अंगावर धावून गेला. यामुळे, तब्बल ४० मिनिटे खेळ थांबवावा लागला होता. सामन्यानंतर दोघांनी एकमेकाविरुद्ध तक्रार केली. मात्र नंतर प्रकरण सामोपचाराने मिटवले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने, गैरवर्तन केले म्हणून इंजमामवर दोन सामन्यांची बंदी घातली.
मालिकेतील तिसरा सामना जिंकून विजयी आघाडी मिळवण्याचे मनसुबे घेऊन भारतीय संघ १७ सप्टेंबरला मैदानात उतरला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान ३१ षटकांत १६९-३ अशा सुस्थितीत होता. पण अचानक पाऊस आल्याने पुन्हा खेळ सुरू होऊ शकला नाही व सामना रद्द करून दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने सामना सुरु करण्याचे ठरले. रद्द झालेल्या सामन्यात पाकिस्तानकडून सईद अन्वरने ७२ धावा तर भारताकडून गांगुलीने २ बळी मिळवले होते.
दुसऱ्या दिवशी, पुन्हा नव्याने सामन्याला प्रारंभ झाला. रमीझ राजा यांनी नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर सौरव गांगुली व सबा करीम प्रत्येकी दोन-दोन तर कर्णधार सचिन खाते न खोलता तंबूत परतला. भारताची अवस्था आठ षटकात तीन बाद तेवीस अशी झाली. द्रवीड, अझर, जडेजा व रॉबिन सिंग यांनी कशीबशी धावसंख्या १८२ पर्यंत नेली. अझरने सर्वाधिक ६७ धावांची खेळी साकारली.
टोरंटोमधील वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर ही धावसंख्या आव्हानात्मक होती. मात्र, भारतीय वेगवान गोलंदाज एकदम नवोदित होते. सईद अन्वर व शाहिद आफ्रिदी यांनी हरविंदर, मोहंती व कुरूविला यांच्या गोलंदाजीचा समाचार घेत ५२ धावांची सलामी दिली. मोहंतीने अन्वरला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. परंतू नेहमीप्रमाणे गरज नसताना आफ्रिदीने सलग दोन चौकार मारत आक्रमक पवित्रा घ्यायला सुरुवात केली असतानाच कुरुविलाने त्याला बाद केले. युवा हरविंदरसिंग याने विरोधी कर्णधारला तंबूत पाठवत सामन्यात रंगत आणली. राजा बाद झाले तेव्हा पाकिस्तानची धावसंख्या १८ षटकात तीन बाद ८७ झाली होती. पाकिस्तानला विजयासाठी ९५ धावा हव्या होत्या. फलंदाज म्हणून सलीम मलिक, मोइन खान व हसन रझा बाकी होते. धावसंख्या पाकिस्तानच्या आवाक्यात होती.
सामना दोन्ही बाजूला झुकू शकत होता. अशातच, भारतीय कर्णधार सचिनने चेंडू सौरव गांगुलीच्या हाती सोपवला. तसे पाहायला गेले तर, गांगुली चांगलीच गोलंदाजी करत असे. कधीकधी पाचव्या गोलंदाजाची भूमिका देखील तो पार पाडत असे. १९ वे षटक टाकायला आलेल्या गांगुलीने चौथ्याच चेंडूवर अनुभवी सलीम मलिकला सचिनच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. पुढच्याच षटकात, हसन रझाने गांगुलीला उंचावुन फटकावायच्या नादात जडेजाच्या हाती झेल दिला. एजाज अहमदला जोरदार बाउन्सर टाकत गांगुलीने विनोद कांबळीकरवी झेलबाद केले.
एकमेव फलंदाज राहिलेला मोईन खान सांभाळून खेळत होता. अखेर गांगुलीने त्याचा संयम तोडत त्याला मोठा फटका खेळण्यासाठी प्रवृत्त केले. मोईनने मोठा फटका खेळला मात्र तो फटका सरळ त्यावेळचा सर्वोत्कृष्ट भारतीय क्षेत्ररक्षक रॉबिन सिंगच्या हातात विसावला. गांगुलीने पाकिस्तानची मधली फळी अक्षरशा कापून काढली होती. त्यानंतर आकिब जावेदला बाद करत गांगुलीने आपले पहिलेवहिले बळीचे पंचक पूर्ण केले. मोहंतीने अझर मेहमूदला बाद करत पाकिस्तानचा डाव १४८ धावांवर संपवला व भारताने मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी मिळवली. त्या सामन्यात गांगुलीचे गोलंदाजी पृथक्करण होते १०-३-१६-५. महत्त्वाचे म्हणजे त्या सामन्यात भारतातर्फे दहा षटके टाकणारा तो एकमेव गोलंदाज होता.
चौथा सामना पुन्हा भारताने जिंकला मात्र अखेरचा सामना जिंकत पाकिस्तानने व्हाईटवॉश टाळला. सहारा फ्रेंडशिप कप भारताने ४-१ अशा फरकाने आपल्या नावे केला होता. २२२ धावा व १५ बळी अशी अष्टपैलू कामगिरी करत, सौरव गांगुलीने मालिकावीर किताब आपल्या नावे केला. आजही ही मालिका इंजमामचे ‘आलू प्रकरण’ व गांगुलीच्या तुफानी कामगिरीसाठी ओळखली जाते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘नवा बोथम’ म्हणून नावाजल्या गेलेल्या डॅरेन गॉफविषयी १० रंजक गोष्टी
जयवर्धनेची भविष्यवाणी! टी-20 विश्वचषकात ‘हा’ खेळाडू नसल्यामुळे भारताला सोसावे लागणार नुकसान
टी-20 विश्वचषकात भारताला मिळणार ‘या’ गोष्टीचा फायदा, मिचेल जॉन्सनची खास प्रतिक्रिया