हा किस्सा आहे वनडे विश्वचषक १९९९चा, ज्यावेळी क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन इंग्लंडमध्ये करण्यात आले होते. त्यावेळी विश्वचषकातील २१ वा सामना खेळण्यासाठी मोहम्मद अझरूद्दीनच्या नेतृत्वात भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरला होता. हा सामना जिंकून पहिल्या सहा संघामध्ये स्थान मिळविण्याचे आव्हान भारतापुढे होते.
त्यादरम्यान २६ मे ला झालेल्या त्या सामन्यात भारतीय संघाचे शिलेदार सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांंनी ऐतिहासिक खेळी केली होती. तसेच भारताला पहिल्या ६ संघांच्या यादीत स्थान मिळवून दिले होते.
इंग्लंडच्या टॉन्टन (Taunton) येथे खेळवण्यात आलेल्या त्या सामन्यात गांगुलीने १५८ चेंडूत तब्बल १८३ धावांची खेळी केली होती. त्यात ७ षटकार आणि १७ चौकारांचा समावेश होता. तर संघसहकारी द्रविडने १२९ चेंडूत १४५ धावा केल्या होत्या. त्यात १ षटकार आणि १७ चौकारांचा समावेश होता.
या २ दिग्गजांनी तूफान खेळी करत दुसऱ्या विकेटसाठी ३१८ धावांची ऐतिहासिक भागीदारी केली होती. श्रीलंकेचा (Sri Lanka) चमिंडा वासच्या (Chaminda Vaas) गोलंदाजीवर गांगुली आणि द्रविडने खूप धुलाई केली होती. भारताने निर्धारित ५० षटकांमध्ये ६ बाद ३७३ धावा केल्या होत्या.
भारताच्या ३७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव २१६ धावांमध्येच संपुष्टात आला होता. तसेच भारताने हा सामन्यात १५७ धावांनी विजय मिळविला होता. या विजयाबरोबरच भारताने सहा सामन्यांच्या ‘अ’ गटात दुसरे स्थान मिळवत पहिल्या सहा संघांमध्ये प्रवेश मिळविला होता.
पहिल्या सहा संघांमध्ये प्रवेश मिळविल्यानंतर भारताची अपेक्षित चांगली कामगिरी करता आली नाही. भारताला आपल्या पाच सामन्यांमध्ये केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला होता. तसेच पहिल्या सहा संघांमध्ये शेवटच्या क्रमांकावर रहात स्पर्धेचा शेवट केला होता.
उपांत्य सामन्यात पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडने प्रवेश केला होता. यामधील पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघाला अंतिम सामन्यात प्रवेश मिळवता आला. त्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पराभूत करत दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले होते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-‘या’ भारतीय खेळाडूंनी सलामीला फलंदाजी केली असती, तर लावला असता धावांचा रतीब