भारतीय क्रिकेटचा इतिहास पाहिला तर अनेक दिग्गज क्रिकेटपटूची नावे यात दिसतील. पण त्यात असे एक नाव आहे, ज्याने सलामीला फलंदाजीची व्याख्याच बदलली नाही, तर आक्रमकता काय असते हे सर्वांना दाखवून दिले. त्याच्या फलंदाजीतील बेफिकीरी हीच त्याची ओळख होती. तो कायम तसाच खेळला आणि त्याने तोच ऍटीट्यूड पुढेही कायम ठेवला. तो क्रिकेटपटू म्हणजे भारताचा सर्वात यशस्वी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवाग.
सेहवाग फलंदाजी करताना आपल्याच धूंदीत असायचा. पहिल्या चेंडू पासून फक्त मोठे फटके मारायचे हे त्याला माहित होतं. खरंतर हेच त्याच्या यशाचं गमक होतं. त्यामुळे नेहमीच तसाच खेळला आणि बाद झाला तरी तो कूल ऍटीट्यूडमध्ये येऊन ड्रेसिंगरुममध्ये बसायचा. सेहवागची अशीच एक सवय म्हणजे तो सामन्यातील परिस्थिती कशीही असो तो एखादे गाणे गुणगुणत फलंदाजी करायचा. सेहवाग सांगतो, त्याच लक्ष केंद्रित व्हावं म्हणून तो फलंदाजी करताना गाणे म्हणायचा. तो फलंदाजी करताना एखादे गाणे म्हणत असताना अनेकदा स्टंप माईकमधून अनेकांनी ऐकले आहे.
असाच सेहवागच्या बाबतीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चेन्नई कसोटीतील एक मजेदार किस्सा आहे. सेहवाग भारताकडून कसोटीत २ त्रिशतके करणारा पहिला आणि सध्यातरी एकमेव क्रिकेटपटू आहे. त्याने पहिले शतक २००४ ला पाकिस्तानविरुद्ध केले होते. तर दुसरे मार्च २००८ ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेन्नई कसोटीत केले. याच चेन्नई कसोटीतील हा किस्सा.
सेहवाग नेहमीप्रमाणे गाणे गुणगुणत फलंदाजी करत होता. असे करता करताच त्याने २७८ चेंडूत त्याचे कसोटीतील दुसरे त्रिशतक पूर्ण केले. त्यावेळी तो कसोटीमध्ये सर्वात जलद त्रिशतक करणारा फलंदाज ठरला होता. आजही हा विक्रम त्याच्या नावावर आहे.
ही त्रिशतकी खेळी करत असताना एकवेळ अशी आली की सेहवाग तो म्हणत असलेल्या गाण्याचे शब्दच विसरला, मग काय तो थोडी गाणे गुणगुणने सोडणार होता. त्याने सरळ त्या सामन्यातील १२ वा खेळाडू इशांत शर्माला बोलावले. १९-२० वर्षांचा असलेला इशांत त्याच्याजवळ आला. त्यावेळी सेहवागने त्याला सांगितले जा आणि त्याच्या आयपॉडमधील गाण्याचे शब्द ऐकून मला सांग. हा किस्सा स्वत: सेहवागने सांगितला आहे.
सेहवाग एका कार्यक्रमाच्या वेळी त्या घटनेच्या आठवणीबद्दल म्हणाला, “एकदा मी चेन्नईमध्ये ३०० धावांवर फलंदाजी करत होतो. मी गाण्याचे शब्दच विसरलो. त्यामुळे मी त्या सामन्यात १२ वा खेळाडू असलेल्या इशांत शर्माला बोलावले. तेव्हा मी त्याला सांगितले जा आणि माझ्या आयपॉडमधून गाण्याचे शब्द ऐकून मला सांग आणि त्यानेही हे केले. नक्कीच सर्वांना वाटले होते की मी इशांतला ड्रिंक्ससाठी (पाणी देण्यासाठी) बोलावले आहे. पण कधीकधी १२ व्या खेळाडूचा अशाप्रकारेही उपयोग होतो. ते गाणे होते ‘तू जाने ना’.”
सेहवाग त्याच्या या गाणे म्हणण्याच्या सवयीबद्दल सांगतो की ‘मी एखाद्या चेंडूचा सामना करण्याआधी विचार करायचो की हा चेंडू चौकार मारायचा की षटकार. पण खूप विचार करणे टाळण्यासाठी आणि माझे लक्ष केंद्रित करण्यासाठी मी गाणे गुणगुणायला सुरुवात केली.’
यावर फॅक्ट चेक केल्यावर असं लक्षात आलं की २६ ते ३० मार्च २००८ रोजी चेन्नईचा हा कसोटी सामना झाला होता. तर अजब प्रेम की गजब कहानी चित्रपट हा ६ नोव्हेंबर २००९ रोजी प्रदर्शित झाला होता व त्यात तू जाने ना असं एक गाणं होतं. त्यामुळे सेहवाग नक्की कोणत्या गाण्याबद्दल सांगत होता हे मात्र माहित नाही.
सेहवाग हा असाच होता, मनमर्जीने फलंदाजी करणारा. त्याच्यासारखं अनेकांनी करण्याचा प्रयत्न केला पण सर्वांना यात यश आले नाही. अनेक क्रिकेटपटू सांगतात, मोकळेपणाने, सगळा दबाव झुगारुन देऊन फलंदाजी करणे, केवळ सेहवाग सारखाच खेळाडू करु शकतो, प्रत्येकाच्या आवाक्यात ती गोष्ट नाही.