टी२० क्रिकेटचे सामने म्हटलं की, सहसा पाहायला मिळते मोठमोठ्या फटक्यांसह फलंदाजांनी केलेली विस्फोटक फलंदाजी आणि गोलंदाजांनी कमीत कमी धावा देत फलंदाजांच्या घेतलेले बळी. तसं तर, वनडेत ५० षटके असल्यामुळे फलंदाज परिस्थितीनुसार मोठमोठे फटके मारत शतकी खेळी करताना दिसतात. पण, २० षटकांच्या क्रिकेट सामन्यांमध्ये त्यांच्यासाठी शतक ठोकणे जरा कठीणच जाते. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत शतक करण्याचा कारनामा डेव्हिड मिलर, रोहित शर्मा आणि एस विक्रमशेखरा यांनी केला आहे.
इंडियन प्रीमियर लीगविषयी (आयपीएल) बोलायचे झाले तर, आयपीएल इतिहासात सर्वाधिक ६ शतके ख्रिस गेलने ठोकली आहेत. गेलपाठोपाठ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने आयपीएलमध्ये ५ शतके लगावली आहेत.
आज आपण या लेखात, आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स संघातील शतक ठोकणाऱ्या फलंदाजांविषयी जाणून घेऊयात. विशेष म्हणजे, १३ हंगामात मुंबई इंडियन्सच्या केवळ चारच फलंदाजाला शतक ठोकता आले आहे. तर बघूयात, कोण आहेत ते ४ फलंदाज ज्यांनी मुंबई इंडियन्सकडून खेळताना शतक ठोकण्याचा कारनामा केला आहे.
सनथ जयसूर्या
आयपीएलच्या पहिल्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळताना श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज सनथ जयसूर्याने प्रथम शतक ठोकण्याचा कारनामा केला होता. १४ मे २००८ रोजी कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध त्याने शतकी खेळी केली होती. केवळ ४८ चेंडूत त्याने नाबाद ११४ धावांची खेळी केली होती. यात ९ चौकार आणि ११ गगनचुंबी षटकारांचा समावेश होता.
त्या सामन्यानंतर जयसूर्याने तब्बल २९ सामने खेळले. मात्र, त्याला एकही शतक करण्यात यश आले नाही. या दिग्गजाने २०१० मध्ये आपला शेवटचा आयपीएल सामना खेळला.
सचिन तेंडुलकर
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक करणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरनेही मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्त्व केले होते. तो २००८ पासून २०१३ पर्यंत मुंबई इंडियन्स संघाचाच भाग होता. आयपीएलमध्ये शतक ठोकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या चार फलंदाजांमध्ये सचिनचाही समावेश आहे.
आयपीएलच्या चौथ्या हंगामात १५ एप्रिल २०११ ला कोची टस्कर्स केरळविरुद्धच्या सामन्यात सचिनने हा कारनामा केला होता. ६६ चेंडूत १२ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने त्याने नाबाद १०० धावा केल्या होत्या.
रोहित शर्मा
मुंबई इंडियन्सला आपल्या नेतृत्त्वाखाली सर्वाधिक ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून देणाऱ्या रोहित शर्मानेही आयपीएलमध्ये मुंबईसाठी एक शतक लगावले आहे. आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये चार शतके ठोकणाऱ्या रोहितच्या नावे आयपीएलमध्ये एकच शतक आहे.
२०० आयपीएल सामने खेळणाऱ्या रोहितने १२ मे २०१२ ला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आपले एकमेव आयपीएल शतक लगावले होते. त्यावेळी ६० चेंडूत त्याने नाबाद १०९ धावा केल्या होत्या. यात १२ चौकार व ५ षटकारांचा समावेश होता. त्यानंतर, ८ वर्षापासून तो आयपीएलमध्ये शतक झळकावू शकला नाही.
लेंडल सिमन्स
मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्त्व केलेला वेस्ट इंडिजचा फलंदाज लेंडल सिमन्स यानेही आयपीएलमध्ये मुंबईकडून शतक ठोकले होते. २१ मे २०१४ ला किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याने हा पराक्रम केला होता. यावेळी ६१ चेंडूत त्याने नाबाद १०० धावांची खेळी केली होती. यात त्याच्या १४ चौकारांचा आणि २ षटकारांचा समावेश होता. हे सिमन्सच्या आयपीएल कारकिर्दीतील एकमेव शतक ठरले.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये यष्ट्यांमागे ‘सुपरमॅन’ असलेले ३ भारतीय विकेटकिपर
एकमेव खेळाडू ज्याने तब्बल ६ वेळा केला आयपीएलच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना
आयपीएलमध्ये ज्या संघाकडून खेळले, त्याच संघाचे महागुरू झालेले ५ दिग्गज