मेलबर्न येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ‘बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिके’चा दुसरा सामना खेळला जात आहे. या ऐतिहासिक सामन्याचा सोमवारी (२८ डिसेंबर) तिसरा दिवस असून भारताचा पहिला डाव ३२६ धावांवर संपुष्टात आला आहे. याबरोबरच भारताने १३१ धावांची आघाडी घेतली आहे. दरम्यान भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा याने खास विक्रमाची आपली नावे नोंद केली आहे.
मिशेल स्टार्कने घेतली जडेजाची विकेट
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावानंतर फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. डावातील पहिल्या २५ षटकांच्या आतच भारताने ३ विकेट्स गमावल्या. त्यानंतर प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अनुभवी फलंदाज हनुमा विहारी या जोडीने मिळून संघाचा डाव सावरला. परंतु ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लायनने विहारीला झेलबाद करत त्यांची भागीदारी तोडली. त्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतही लवकरच बाद झाला. मात्र सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या जडेजाने रहाणेला चांगली साथ दिली.
रहाणे आणि जडेजा यांनी तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ५ बाद २७७ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. दमदार फॉर्ममध्ये असलेल्या या अष्टपैलूने १०१व्या षटकापर्यंत त्याचे अर्धशतकही पूर्ण केले. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने जडेजाला जास्त वेळ मैदानावर टिकू दिले नाही. त्याने डावातील १०६.५ षटकात पॅट कमिन्सच्या हातून त्याला झेलबाद केले. त्यामुळे ३ चौकारांच्या मदतीने ५७ धावा करत जडेजा पव्हेलियनला परतला.
जडेजा ठरला दुसरा भारतीय खेळाडू
असे असले तरी, खालच्या फळीत फलंदाजीस आलेल्या जडेजाने मोठा विक्रम नोंदवला होता. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ५० पेक्षा जास्त धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. जडेजापुर्वी माजी भारतीय अष्टपैलू कपिल देव यांनी पहिल्यांदा हा विक्रम केला होता. १९८५ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत सातव्या क्रमांकावर फलंदाजीस येत त्यांनी ५५ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS Live : भारताचा पहिला डाव ३२६ धावांवर संपुष्टात; १३१ धावांची घेतली आघाडी
जडेजाची अर्धशतक पूर्ण करण्याची घाई नडली; रहाणेच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच झाली ‘ही’ नकोशी घटना
एक ही दिल कितनी बार जितोगे! अजिंक्यने स्वतः धावबाद होऊनही जडेजाला दिले प्रोत्साहन, पाहा फोटो