कोरोना या साथीच्या आजारात आयपीएल २०२१ ची सुरुवात झाली आहे. पहिला सामना आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झाला. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये जोरदार झुंज झाली. मात्र, आरसीबीने सलामीचा सामना जिंकून हंगामाची विजयी सुरुवात केली.
या सामन्यात युवा सलामीवीर देवदत्त पडिक्कल खेळू शकला नाही. २२ मार्च रोजी पडिक्कलचा कोरोना अहवाल सकारात्मक आला. यानंतर त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले. या विषाणूपासून मुक्त झाल्यानंतर पडिक्कल ७ एप्रिल रोजी संघाच्या बायो बबलमध्ये सामील झाला. त्यानंतर, आरसीबी व्यवस्थापनाकडून असे निवेदन आले होते की, प्रोटोकॉलनुसार तो संघाशी जोडला गेला आहे.
परंतु, आता आयपीएलच्या फ्रँचायझींनी देवदत्त पडिक्कलच्या थेट बायो-बबलमध्ये येण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आरसीबी व्यवस्थापनाने नियमांचा फायदा उठवत पडिक्कलला तातडीने संघात सामील करून घेतले का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नियमांचा फायदा उठवला नाही ना?
पडिक्कल प्रकरणावर एका आघाडीच्या क्रिकेट संकेतस्थळावर एका फ्रँचायझीच्या हवाल्याने वृत्त आले आहे की, ‘७ दिवस हॉटेल रूममध्ये क्वारंटाईन होणे बंधनकारक आहे. मात्र, पडिक्कलच्या बाबतीत असे काही दिसले नाही. बायो बबल नियमांचा फायदा तर उठवला गेला नाही ना? होम क्वारंटाईनची परवानगी होती तर, आमच्या संघाचे अनेक खेळाडू तसे करू शकले असते.’
त्यानंतर आरसीबी व्यवस्थापनाकडून स्पष्टीकरण आले की, ‘पडिक्कलची कोरोना चाचणी तीन वेळा नकारात्मक आली. त्याबरोबर, बीसीसीआयने आखून दिलेल्या सर्व नियमावलींचे पालन केले गेले आहे.’
काय आहे बीसीसीआयचा नियम?
बीसीसीआयने जारी केलेल्या कोरोनाच्या नियमांनुसार प्रत्येक खेळाडूला बबलमध्ये जाण्यापूर्वी ७ दिवस हॉटेलमध्ये रहाणे अनिवार्य आहे. यासह, प्रत्येक फ्रँचायझीच्या सदस्यांनाही संघात सहभागी होण्यापूर्वी कोविड-१९ आरटी-पीसीआर चाचणी करून प्रशिक्षण सुरू करावे लागेल.
या चाचणीत नाकातून नमुने घेतले जातात. नमुना घेतल्यानंतर चाचणी अहवाल ८ ते १२ तासांत येतो. जोपर्यंत अहवाल ३ वेळा नकारात्मक येत नाही, तोपर्यंत बायो बबलमध्ये प्रवेश करता येत नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: चेन्नईला पराभूत केल्यानंतरही पंतने जिंकली धोनीच्या चाहत्यांची मने, ‘हे’ आहे कारण
शिखर धवनचा मोठा कारनामा; ‘हा’ रेकॉर्ड करणारा बनला जगातील पहिलाच क्रिकेटर