वेस्ट इंडिज संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. टी २० क्रिकेटमधील या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ३ टी२० सामन्यांची मालिका पार पडली. या तीन सामन्यांपैकी एकही सामन्यात वेस्ट इंडिज संघाला विजय मिळवता आला नाही. ३ टी२० सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम टी२० सामना गुरुवारी (१६ डिसेंबर) पार पडला. या सामन्यात पाकिस्तान संघाने ७ गडी राखून विजय मिळवला. ही मालिका पाकिस्तान संघाने ३-० ने आपल्या नावावर केली. यासह टी२० क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम देखील आपल्या नावावर केला आहे.
बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने गेल्या काही वर्षांत अप्रतिम कामगिरी केली आहे. टी२० विश्वचषक स्पर्धेत आणि बांगलादेश संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत या संघाने चांगली कामगिरी केली होती. हीच कामगिरी वेस्ट इंडिज संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत देखील पाहायला मिळाली. गुरुवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तान संघाला विजय मिळवण्यासाठी २०८ धावांची आवश्यकता होती. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने ७ गडी राखून आणि ७ चेंडू शिल्लक ठेऊन विजय मिळवला.
हा पाकिस्तान संघाने धावांचा पाठलाग करताना मिळवलेला सर्वात मोठा विजय आहे. याच वर्षी पाकिस्तान संघाने ३ टी२० क्रिकेटमध्ये ३ मोठे विजय मिळवले आहेत. २०८ धावांचा यशस्वी पाठलाग करण्यापूर्वी पाकिस्तान संघाने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध २०५ धावांचा पाठलाग केला होता. त्यापूर्वी जोहान्सबर्गमध्ये झालेल्या सामन्यात पाकिस्तान संघाने १८९ धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला होता.
पाकिस्तान संघाने टी२० क्रिकेटमध्ये केलेल्या सर्वात मोठ्या धावांचा पाठलाग
२०८ धावा – विरुद्ध वेस्ट इंडिज (२०२१)*
२०५ धावा – विरुद्ध दक्षिण आफ्रिका (२०२१)
१८९ धावा – विरुद्ध दक्षिण आफ्रिका (२०२१)
१८७ धावा – विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२०२१)
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर वेस्ट इंडिज संघाने नाणेफक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना निकोलस पूरनने सर्वाधिक ६४ धावांची खेळी केली होती. तर, ब्रुक्सने ४९ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिज संघाला २० षटक अखेर ३ बाद २०७ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाकडून मोहम्मद रिजवानने सर्वाधिक ८७ धावांची खेळी केली. तर बाबर आजमने ७९ धावांचे योगदान देत हा सामना पाकिस्तान संघाला ७ गडी राखून जिंकून दिला.
महत्वाच्या बातम्या :
रोहितची दुखापत ‘या’ फलंदाजाच्या पडली पथ्यावर; विराट शिक्कामोर्तब करत म्हणाला, ‘मयंकसोबत तो सलामी..’
सचिन, विराटनंतर रोहित बनला ‘अलिबागकर’, कोट्यवधींमध्ये पैसा ओतत पत्नीच्या नावे विकत घेतली जमीन!