यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा यूएई आणि ओमानमध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघ कसून सराव करताना दिसून येत आहेत. तर, अनेक दिग्गज खेळाडू भविष्यवाणी करत आहेत की, या स्पर्धेत कुठला संघ बाजी मारेल. अशातच माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने देखील आपले मत मांडले आहे.
पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज आणि रावळपिंडी एक्सप्रेस नावाने प्रसिद्ध असणारा, माजी पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तर हा नेहमीच आपल्या विविध वक्तव्यामुळे चर्चेत येत असतो. त्याचे असे म्हणणे आहे की, या आगामी विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना हा पहिल्या टी२० विश्वचषक स्पर्धेसारखाच असेल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ बाबर आजमच्या पाकिस्तान संघाचा सामना करेल. त्याने असेही म्हटले आहे की, या सामन्यात पाकिस्तान संघ भारतीय संघाला पराभूत करेल. (pakistan will beat india in t-20 world cup final says shoaib akhtar)
शोएब अख्तरने स्पोर्ट्स तकच्या यूट्यूब चॅनलवर चर्चा करताना म्हटले की, “मला असे वाटते की, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रंगेल. यूएईमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांसाठी परिस्थिती अनुकूल आहे.”
शोएब अख्तरने असे वक्तव्य केले असेल, तरीही भारत आणि पाकिस्तान यांची विश्वचषक स्पर्धेतील आकडेवारी पाहिली तर, पाकिस्तान संघाने अजूनपर्यंत भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धेत पराभूत केले नाही. विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवण्याच्या बाबतीत भारतीय संघ ११-० ने पुढे आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये विश्वचषक स्पर्धेतील शेवटची लढत २०१९ वनडे विश्वचषक स्पर्धेत पाहायला मिळाली होती. या सामन्यात भारतीय संघाने ८९ धावांनी विजय मिळवला होता. तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा टी-२० सामना २०१६ टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळला गेला होता. कोलकातामध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने ६ गडी राखून विजय मिळवला होता. परंतु, २०१७ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीलंका संघाला क्लीन स्वीप होण्यापासून वाचवू शकते ‘ही’ एक गोष्ट; वाचा कुठली आहे ती गोष्ट
वाढदिवस विशेष: बुद्धिबळ खेळायला पैसे नसल्याने क्रिकेटर झालेला भारताचा स्टार खेळाडू ‘युजवेंद्र चहल’